शासकीय योजनांचा लाभ घेवून महिलांनी वेगवेगळ्या व्यवसायाद्वारे आपले कुटुंब सक्षम बनवावे : अरुंधती महाडिक
schedule07 Jun 25 person by visibility 355 categoryसामाजिक

कोल्हापूर : राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेमुळे सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावत आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून, महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळे व्यवसाय उभे करावेत आणि आपले कुटुंब आर्थिकदृष्टया सक्षम करावे, असे प्रतिपादन भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी केले. करवीर तालुक्यातील वाशी येथे बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप प्रसंगी त्या बोलत होत्या.
करवीर तालुक्यातील वाशी येथे ग्रामपंचायत सदस्य संतोष रानगे यांच्या प्रयत्नातून बांधकाम कामगारांना राज्य शासनातर्फे मिळणार्या भांडी संचाचे आणि गॅस सिलेंडरचे वितरण करण्यात आले. भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्यासह प्रमुख पाहुण्यांचे स्वागत ढोल कैचाळाच्या निनादात करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य संतोष रानगे यांनी या परिसरात राबवलेल्या विकासकामांची माहिती दिली. खासदार धनंजय महाडिक यांच्या सहकार्यातून विविध शासकीय योजनेचा लाभ वाशी ग्रामस्थांना दिल्याचे सांगितले. दरम्यान कुटुंबाची आर्थिक व्यवस्था सक्षम होण्यासाठी महिलांनी स्वावलंबी बनणे गरजेचे आहे. बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळे उद्योग उभे केले पाहिजेत. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन सौ. अरुंधती महाडिक यांनी केले. तसेच महाडिक परिवार संतोष रानगे यांच्या समाजोपयोगी उपक्रमात सोबत राहील, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला भोगावती कारखान्याचे संचालक बी. ए. पाटील, ग्रामपंचायत सदस्य अरुण कांबळे, सदस्या रोहिणी पाटील, सारिका रानगे, अमोल पाटील, कृष्णात पाटील, प्रदीप पाटील, नारायण पाटील, सरदार रानगे यांच्यासह महिला, ग्रामस्थ लाभार्थी उपस्थित होते.