ए.आय. ज्ञाननिर्मितीचे नव्हे; माहितीचे साधन: डॉ. ज्ञानेश्वर गटकर
schedule09 Aug 26 person by visibility 142 categoryशैक्षणिक
शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागात 'संशोधनात ए.आय.' वर विशेष कार्यशाळा
कोल्हापूर : कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) हे ज्ञान मिळवण्याचे किंवा ज्ञानाच्या निर्मितीचे साधन नसून ते केवळ माहिती देऊन आपल्याला मदत करणारे एक साधन आहे. संशोधक म्हणून ज्ञानाची नवनिर्मिती ही मानवी बुद्धीलाच करावी लागणार आहे, असे प्रतिपादन यवतमाळ येथील लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. ज्ञानेश्वर गटकर यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागाच्या वतीने आयोजित ‘संशोधनामध्ये ए.आय.चा वापर’ या विषयावरील विशेष कार्यशाळेत काल प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अधिविभाग प्रमुख डॉ. प्रकाश पवार होते.
डॉ. गटकर म्हणाले की, ए.आय.कडे कितीही सृजनशीलता असली तरी ती विवेकी असेलच, असे नाही. ए.आय. स्वयंचलित वाटत असले तरी माणसाची बुद्धी त्याला जशी आज्ञा (प्रॉम्प्ट) देईल, त्यानुसारच ते कृती करते. कृत्रिम बुद्धिमत्तेवर काम करण्यापूर्वी आपण मानवी चुका आणि अज्ञानावर मात केली पाहिजे.
आपल्या सादरीकरणात डॉ. गटकर यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उगमापासून ते आजच्या आधुनिक युगातील संशोधनातील व कार्यालयीन वापरापर्यंतचा प्रवास उलगडला. 'ट्युरिंग टेस्ट' आणि अलान ट्युरिंग यांच्या संकल्पनेपासून सुरू झालेला ए.आय.चा प्रवास आज 'चॅट-जीपीटी', 'जेमिनी', 'क्लॉड' आणि विविध ए.आय. एजंट्सपर्यंत कसा पोहोचला, याची सविस्तर माहिती दिली. शोधनिबंधांचे विश्लेषण, डेटा क्लीनिंग, संदर्भ शोधणे यासाठी आधुनिक टूल्सचा वापर कसा करावा, याविषयीही मार्गदर्शन केले.
डॉ. प्रकाश पवार अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, तंत्रज्ञान वेगाने वाढत आहे. सध्याची पिढी टेक्नोसेव्ही आहे. संशोधक विद्यार्थ्यांनी ए.आय. सारख्या तंत्रज्ञानाची मदत घ्यावी. संशोधन योग्य दिशेला घेवून जाण्यासाठी तंत्रज्ञानाचा विवेकी वापर होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी संशोधनात हे तंत्रज्ञान साह्य घेत असताना संशोधन पद्धतीची चौकट मोडता कामा नये.
डॉ. सुखदेव उंदरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. दत्तात्रय सावंत यांनी परिचय करून दिला. कार्यशाळेला राज्यशास्त्र, समाजशास्त्र विभागातील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी आणि पदव्युत्तर वर्गाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.