राधानगरी पर्यटन विकास प्राधिकरणाच्या कामास गती द्या : पालकमंत्री प्रकाश आबिटकर
schedule01 Aug 26 person by visibility 94 categoryराज्य
कोल्हापूर : राधानगरी वन्यजीव अभयारण्यासह राधानगरी धरण व 84 गावांसाठी विशेष पर्यटन विकास प्राधिकरण जाहीर करण्यात आले आहे. या पर्यटन विकास प्राधिकरणाच्या कामास गती द्या, असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिले.
यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले , राधानगरी व दाजीपूर येथील पर्यटन दृष्ट्या या भागाचा विकास करण्यासाठी डी.पी.आर. बनविण्याचे काम महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे सोपविण्यात आले आहे. त्यानुसार या गावातील पर्यटन विकासासाठीचा प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी कोल्हापूर आणि सहसंचालक समाधान पाटील यांनी समन्वयाने करावी . सदरचा आराखडा तयार करत असताना त्या त्या गावातील नागरिकांसोबत चर्चा करून तसेच त्यांच्या सूचना विचारात घेऊन आराखडा करावा, अशा सूचना दिल्या.
यावेळी पालकमंत्र्यांनी राधानगरी व काळम्मावाडी धरण परिसर व तेथील विश्रामगृह, बोटॅनिकल गार्डन यासह जिल्हा विकास निधी अंतर्गत सुरू असलेल्या पर्यटन विषयक कामांचा आढावा घेवून येत्या एक ऑक्टोबर रोजी या कार्यक्षेत्रातील पर्यटनाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले .
याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, मनपा आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन, राधानगरी प्रांतधिकारी प्रसाद चौगुले , उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील,विभागीय वन्यजीव अधिकारी श्रीकांत पवार, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर , महावितरणचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय भनगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे भाऊसाहेब हजारे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते .