SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
चोपडाई देवी यात्रेनिमित्त जोतिबा मार्गावर पार्किंगला बंदीकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात अखंड भारताचा सुवर्णकाळ: स्वातंत्र्यदिन आणि आपल्या कर्तव्याची दिशासोमवारी ‘या’ कारणामुळे बालिंगा पंपिंग स्टेशन राहणार बंद!राज्य शासनाच्या विविध योजनांसह महापालिका स्वनिधीतून १६६ कोटी ९३ लाखांची रस्त्यांची कामे सुरूकोल्हापूर महानगर पालिका : बेकायदेशीर नळ कनेक्शन रितसर करण्यासाठी १० दिवसांची मुदत; त्यानंतर दंडात्मक व फौजदारी कारवाईदत्तवाडचे आरोग्यमंदिर लवकरच जनतेच्या सेवेत : आमदार यड्रावकर देवीदास मिसाळ, कृष्णा ठाकरे यांच्याविरोधात उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच येथे अवमान याचिका दाखलनवापूर येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय आढावा बैठक खुपिरेच्या बलमीम विकास संस्थेच्या संचालकावर कारवाई करावी अन्यथा आत्मदहन; सामाजिक कार्यकर्ते सरदार बंगे यांचा इशारा

जाहिरात

 

केडीसीसी बँक कर्जमाफीतील पात्र शेतकऱ्यांचा व्याजाचा भार उचलणार

schedule31 Jul 26 person by visibility 352 categoryउद्योग

◼️बँक नफ्यातून भरणार १० कोटींहून अधिक व्याज रक्कम  
◼️शेतकऱ्यांना दिलासा देणारा संचालक मंडळाचा ऐतिहासिक निर्णय                  
       
कोल्हापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना- २०२६ या  योजनेतील पात्र शेतकऱ्यांचा व्याजाचा भार केडीसीसी बँक स्वतः उचलणार आहे. रू. १० कोटींहून अधिक व्याजाची ही रक्कम बँक स्वतःच्या नफ्यातून व्याजापोटी भरणार आहे. बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णय झाला. दरम्यान; पात्र शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीचा लाभ लवकर मिळण्यासाठी लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण करावे, असे आवाहन केडीसीसी बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. 
          
याबाबत अधिक माहिती अशी, राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना- २०२६ राबविली. या योजनेत दोन लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्ज थकबाकीदारांना संपूर्ण कर्जमाफी मिळणार आहे. तसेच; दोन लाखावरील पीक कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांनी एकवेळ समझोता योजने (ओ. टी. एस.) अंतर्गत दोन लाखावरील थकबाकीची रक्कम भरल्यास त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. 
        
कर्जमाफी होणाऱ्या शेतकऱ्यांना दि. ३१ मार्च २०२६ अखेरचे व्याजही महाराष्ट्र सरकारने दिले आहे. दरम्यान; या कर्जमुक्ती योजनेचा प्रत्यक्षात लाभ मिळण्यास ६ महिन्यांहून अधिक कालावधी लागणार आहे. त्यामुळे दि. १ एप्रिल २०२६ पासून कर्जमाफीस  पात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंतच्या कालावधीतील व्याजाची रक्कम शेतकऱ्यांना  भरायला लागू नये म्हणून केडीसीसी बँकेने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 
          
पीक कर्ज योजनेत रू. तीन लाखापर्यंतचे पीक कर्ज घेऊन नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याला सहा टक्के व्याजदराने पिक कर्ज पुरवठा होतो. त्यामध्ये केंद्र सरकारची व्याज सवलत तीन टक्के आणि राज्य सरकारची व्याज सवलत तीन टक्के, असा हा कर्जपुरवठा शून्य टक्के व्याजदराने होतो. शेतकरी थकबाकीत गेल्यानंतर केंद्र व राज्य सरकारची व्याज सवलत बंद होऊन व्याजदर साडेबारा टक्के होतो. दरम्यान;  राज्य शासनाने कर्जमाफीतील पात्र शेतकऱ्यांवर दोन टक्के दंडव्याज आकारणी करू नये, अशा सूचना दिल्यामुळे ही आकारणी साडेदहा टक्के होते. त्यापैकी दोन टक्के  विकास सेवा संस्थांचे मार्जिन असते आणि बँकेचे व्याज साडे आठ टक्के असते. या दोन्हीही रक्कमा आता बँकच भरणार आहे. 
               
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये केडीसीसी बँकेने २९,४२९ शेतकऱ्यांची माहिती महाराष्ट्र राज्य सरकारच्या पोर्टलवर अपलोड केलेली आहे. या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफीची एकूण रक्कम रु. २३५ कोटी रुपये होते. त्यापैकी पहिल्या टप्प्यातच २३,१३१ पात्र शेतकऱ्यांची यादी केडीसीसी बँकेला प्राप्त झाली आहे. या सर्व शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केल्यानंतर थोड्याच दिवसात कर्जमाफीची रक्कम केडीसीसी बँकेला प्राप्त होईल. 
​         
◼️ॲग्रीस्टॅक नसणाऱ्या व मयत शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा :  मंत्री  मुश्रीफ
मंत्री  मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,  या योजनेमध्ये ॲग्रीस्टॅक नोंदणी नसणारे शेतकरी व मयत शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण होत नसल्यामुळे लाभाबाबत तांत्रिक अडचणी उद्भवल्या आहेत. या संदर्भाने मी मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. त्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की, ज्यांच्या नावावर शेतजमीन नाही त्यांनी कुटुंबातील शेतजमीन नावावर असलेल्या शेतकऱ्यांच्या संमतीने पीककर्ज उचल केलेले आहे. तसेच; काही शेतकऱ्यांनी देवस्थानच्या जमिनीवरही पीककर्ज उचल केलेले आहे. काही शेतकऱ्यांचे वडील मयत झाल्यानंतर अद्यापही सातबारा वारसांच्या नावावर झालेला नाही. अशा पीक कर्जधारक शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅक होत नाही. तसेच; सेवा संस्थांकडून आलेल्या पीक कर्जधारक शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करीत असताना शेतकरी जिवंत होते, परंतु; त्यानंतर काही मयत झालेले आहेत. अशा शेतकऱ्यांबाबत योग्य तो तोडगा काढून कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केल्याचे श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.
                
यावेळी बँकेच्या संचालक मंडळातील आमदार डाॅ. राजेंद्र पाटील- यड्रावकर,  माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, माजी आमदार राजेश पाटील,  माजी आमदार संजयबाबा घाटगे,  ए. वाय. पाटील, प्रताप उर्फ भैया माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, विजयसिंह माने,  राजेश पाटील, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी, कर्मचारी प्रतिनिधी दिलीप लोखंडे व गजानन पाटील आदी सदस्य उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes