आवास प्लस 2024 सर्वेक्षणातील लाभार्थी यादीला मिळणार 15 ऑगस्टच्या ग्रामसभेत मान्यता
schedule10 Aug 26 person by visibility 82 categoryराज्य
कोल्हापूर : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत जिल्ह्यातील १ हजार २९ ग्रामपंचायतींमध्ये बेघर व कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांचे आवास प्लस २०२४ सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या सर्वेक्षणात एकूण १ लाख ३६ हजार २३८ कुटुंबांची नोंद करण्यात आली आहे. सर्वेक्षणाची तालुकास्तरावर पडताळणी करण्यात आली असून, मसुदा प्रतीक्षा यादी ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या यादीला १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत मान्यता देण्यात येणार आहे. ग्रामसभेच्या मान्यतेनंतर जिल्ह्याला प्राप्त होणाऱ्या उद्दिष्टानुसार पात्र नवीन लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात येणार आहे. तालुकानिहाय सर्वेक्षणात आजरा ७ हजार ८९३, गगनबावडा २ हजार १८८, भुदरगड १३ हजार ४५०, चंदगड ८ हजार १९६, गडहिंग्लज १० हजार २९०, हातकणंगले १२ हजार ५०८, कागल १२ हजार ७९८, करवीर १७ हजार २६८, पन्हाळा १३ हजार ४६५, राधानगरी १४ हजार ९१०, शाहूवाडी १० हजार २८ आणि शिरोळ १३ हजार २४४ कुटुंबांचा समावेश आहे.
बेघर, कच्च्या घरातील तसेच निराधार कुटुंबांना प्राधान्य देण्यात येणार असून, हाताने मैला उचलणारे, भिक्षेकरी, दिव्यांग, आदिम जमाती समूह आणि कायद्याने मुक्त केलेले वेठबिगार यांचा प्राधान्याने विचार केला जाणार आहे. पक्के घर, दोनपेक्षा अधिक खोल्या, चारचाकी वाहन, शासकीय नोकरी, आयकर भरणे, ठरावीक मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न अथवा जमीनधारणा यांसह निर्धारित निकषांमध्ये अपात्र ठरणाऱ्या कुटुंबांना लाभातून वगळण्यात येणार आहे.
एकही पात्र बेघर कुटुंब वंचित राहू नये आणि अपात्र व्यक्तीला लाभ मिळू नये, यासाठी प्रक्रिया पारदर्शक व डिजिटल पद्धतीने, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालीच्या सहाय्याने राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी दिली.
ग्रामसभेत यादीला मान्यता देताना लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवून प्रक्रियेत पारदर्शकता राखावी, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष शिल्पा खोत यांनी केले.