संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनांच्या पेन्शनमध्ये वाढ करा; शिष्टमंडळाची निवासी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
schedule09 Sep 26 person by visibility 108 categoryसामाजिक
कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना आणि दिव्यांग पेन्शन योजनेतील विविध अडीअडचणींसंदर्भात लाभार्थ्यांच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन सादर करण्यात आले. संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष किशोर घाटगे आणि अखिल भारतीय हिंदू महासभेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हे निवेदन दिले. हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सामाजिक न्याय मंत्री नरहरी झिरवळ यांना देण्यात आले आहे.
या निवेदनात लाभार्थ्यांना दरमहा नियमित पेन्शन वितरीत करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच डीबीटी (DBT) पोर्टल वारंवार बंद राहत असल्याने लाभार्थ्यांची होत असलेली गैरसोय आणि त्यावरून शासकीय कर्मचारी व लाभार्थी यांच्यात होणारे वाद टाळण्यासाठी हे पोर्टल नियमित करून आठवड्याचे सातही दिवस सुरू ठेवावे, अशी आक्रमक मागणी करण्यात आली. दिव्यांग लाभार्थ्यांचे अद्यावतीकरण होत नसल्याने त्यांना सुलभ पर्याय देण्याची आणि आधार प्रमाणिकरणाचा पर्याय पोर्टलवर उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली. याशिवाय, लाभार्थी स्थिती तपासण्यासाठी नागरिक लॉगिनवर स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी विनंतीही करण्यात आली.
सध्याच्या वाढत्या महागाईचा ताण लक्षात घेता संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांची पेन्शन किमान तीन हजार रुपये करण्यात यावी, तसेच दिव्यांगांची पेन्शन वाढवून चार हजार रुपये करण्यात यावी, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
शिष्टमंडळाच्या या निवेदनाची दखल घेत निवासी जिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी वेब पोर्टलच्या अनियमिततेसंदर्भात येत्या शुक्रवारी तातडीने विशेष बैठक घेण्याचे मान्य केले.
या शिष्टमंडळात शीलाताई माने, सुनीता भोसले, वर्षा चंद्रकांत शिंदे, प्रशांत पाटील, अंजली साळुंखे, प्रभावती चित्र, शोभा साळुंखे, नीलांगी पाटील, विकास यादव, पूजा आडदांडे, अनिल कामत, अमर माने तसेच प्रहार संघटनेचे अध्यक्ष किरण काळे यांच्यासह मोठ्या संख्येने लाभार्थी व दिव्यांग बांधव उपस्थित होते.