कामगारांचा संताप! कोल्हापुरात लाल बावट्याचा विराट 'आक्रोश मोर्चा'; भ्रष्ट कारभाराचे वाभाडे!
schedule23 Mar 26 person by visibility 113 categoryसामाजिक
कोल्हापूर : बांधकाम कामगारांच्या हक्काच्या योजनांमधील भ्रष्टाचार आणि प्रशासकीय दिरंगाईविरोधात आज 'लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेने' (सिटू) सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर धडक देत जोरदार 'आक्रोश मोर्चा' काढला. हजारो कामगारांच्या उपस्थितीत निघालेल्या या मोर्चामध्ये घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घेताना खऱ्या कामगारांना सहा-सहा महिने ताटकळत ठेवावे लागते, तर दुसरीकडे बोगस कामगारांना मात्र सहज लाभ मिळत असल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला आहे. विशेषतः नोंदणी आणि नूतनीकरणाच्या प्रक्रियेत मुद्दाम त्रुटी काढून अर्ज फेटाळले जात असल्याने कामगारांमध्ये तीव्र संताप आहे. सांगली जिल्ह्यात झालेल्या भ्रष्टाचाराचा दाखला देत, दोषी अधिकारी आणि लिपिकांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी सादर केलेल्या १८ प्रमुख मागण्यांमध्ये ६० वर्षांवरील कामगारांना तात्काळ पेन्शन लागू करणे, दिवाळी बोनस अदा करणे आणि शिष्यवृत्तीच्या रकमेत दुप्पट वाढ करून ती एका महिन्यात देण्याचा समावेश आहे. आरोग्य योजनेच्या नावाखाली कंत्राटदार कंपन्यांचे फावले जात असून, त्याऐवजी कुटुंबाला १० लाखांचे विमा संरक्षण देण्याची मागणी संघटनेने केली आहे. तसेच घरकुल योजनेचा रखडलेला ५० हजारांचा हप्ता त्वरित मिळावा आणि बायोमेट्रिक (थम) दिल्यानंतर त्याच दिवशी नोंदणी व लाभाचे अर्ज मंजूर व्हावेत, असा आग्रह धरण्यात आला. सेवा हक्क कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा अध्यक्ष भरमा कांबळे, मार्गदर्शक शिवगोंडा खोत आणि सरचिटणीस शिवाजी मगदूम यांनी दिला आहे. यावेळी संघटनेचे पदाधिकारी, कामगार, महिला, मोठ्या संख्येने उपस्थित होते.


