कुडीत्रे येथे ‘तालुकास्तरीय पौष्टिक तृणधान्य कार्यशाळा’ उत्साहात संपन्न
schedule22 Mar 26 person by visibility 102 categoryराज्य
▪️महिला गटांच्या तृणधान्य पदार्थांचे सादरीकरण आणि ऊस उत्पादकता तंत्रज्ञान ठरले आकर्षण
कोल्हापूर : बदलत्या जीवनशैलीमुळे वाढत असलेल्या मधुमेह व हृदयविकारांसारख्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आहारात तृणधान्यांचा समावेश करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले. राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियानांतर्गत कुडीत्रे येथील शेतकरी सांस्कृतिक भवनात आयोजित ‘पौष्टिक तृणधान्य कार्यशाळा २०२५-२६’ उत्साहात पार पडली, यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन कुंभी कासारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन राहुल खाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी जालिंदर पांगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
▪️कार्यशाळेची वैशिष्ट्ये- तृणधान्य पाककृतींचे आकर्षण :
स्थानिक महिला बचत गटांनी ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई व राजगिरा यांपासून विविध पौष्टिक पदार्थ सादर केले. लोह, कॅल्शियम व झिंकने समृद्ध आणि ‘ग्लुटेनमुक्त’ असलेल्या या पदार्थांचे मान्यवरांनी कौतुक केले. तृणधान्यांच्या मूल्यवर्धनातून महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
▪️ऊस उत्पादकांसाठी आधुनिक मार्गदर्शन :
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष तांत्रिक सत्र आयोजित करण्यात आले. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ऊस उत्पादन कसे वाढवता येईल, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळवता येईल, यावरही चर्चा करण्यात आली.
▪️तज्ज्ञांचे मार्गदर्शन :
डॉ. योगेश बन यांनी तृणधान्यांच्या सुधारित लागवड तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली. तृणधान्ये ही केवळ पिके नसून मानवी आरोग्यासाठी औषधी गुणधर्म असलेली आहेत. मधुमेह, हृदयविकार व उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी तृणधान्ये उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जालिंदर पांगरे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देत शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे नियोजन तालुका कृषी अधिकारी करवीर तसेच मंडल कृषी अधिकारी करवीर, बीड व कळंबा यांनी केले होते. कार्यशाळेला करवीर तालुक्यातील शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


