कोल्हापूर जिल्हास्तरीय धान्य महोत्सवास ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
schedule22 Mar 26 person by visibility 103 categoryराज्य
दोन दिवसांत एक कोटींहून अधिक रुपयांची विक्रमी उलाढाल
कोल्हापूर : महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय ‘जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचा’ आज अत्यंत उत्साहात समारोप झाला. राजारामपुरी येथील व्ही. टी. पाटील स्मृती सदन येथे २१ व २२ मार्च रोजी संपन्न झालेल्या या महोत्सवात कोल्हापूरकरांनी खरेदीचा विक्रमी उत्साह दाखवला असून, २ दिवसात १ कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या शेतमालाची थेट विक्री झाली आहे.
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला दर्जेदार शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवून त्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे, हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश होता. कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक श्री. बसवराज मास्तोळी यांच्या हस्ते या महोत्सवाचे रीतसर उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. जालिंदर पांगरे, कृषी उपसंचालक श्री. नामदेव परीट, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. अरुण भिंगारदेवे , श्री. किरण पाटील,श्री पोपट पाटील यांसह कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🟠शेतकरी व ग्राहकांकडून उपक्रमाचे स्वागत
या उपक्रमाबाबत दोन्ही घटकांकडून अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. मध्यस्थांची साखळी मोडीत निघाल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला (Fair Price) मिळाला. थेट ग्राहकांशी संवाद साधल्यामुळे बाजारपेठेतील मागणीचा कल समजण्यास मदत झाली असे मत सहभागी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी व्यक्त केले. कृषी विभागा कडून उच्च दर्जाचा सेंद्रिय शेतीमाल, विशेषतः आजरा घनसाळ तांदूळ, सेंद्रिय गूळ आणि पौष्टिक तृणधान्ये रास्त दरात उपलब्ध करून दिल्यामुळे अशा महोत्सवांमुळे शुद्ध अन्नाची खात्री मिळते अशा प्रतिक्रिया ग्राहकांनी नोंदवल्या.
🟠विक्रमी आर्थिक उलाढाल: एकूण ६० स्टॉल्सच्या माध्यमातून विविध कडधान्ये, फळे आणि प्रक्रियायुक्त पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली.
🟠 मिलेट रॅली व जनजागृती: 'आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष' निमित्त आज सकाळी कृषी विभागाच्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काढलेल्या 'मिलेट रॅली'द्वारे पौष्टिक आहाराचा संदेश शहरात पोहोचवण्यात आला.
शाश्वत शेतीला प्रोत्साहन: सेंद्रिय व नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या मालाला ग्राहकांनी विशेष पसंती दिली, ज्यामुळे शाश्वत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मनोबल उंचावले आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. जालिंदर पांगरे यांनी महोत्सवाच्या यशस्वीतेबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, कोल्हापूरकरांनी दिलेला हा प्रतिसाद शेतकऱ्यांना बळकटी देणारा आहे. भविष्यातही अशा प्रकारचे थेट विपणनाचे (Direct Marketing) उपक्रम राबवून शेतकरी व ग्राहक यांच्यातील दुवा अधिक मजबूत केला जाईल.


