कृष्णा नदीपात्रात ७०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग; पाटबंधारे विभागाला आमदार यड्रावकर यांच्या सूचना
schedule18 Sep 26 person by visibility 57 categoryराज्य
जयसिंगपूर : लांबलेला पाऊस, खरीप हंगामातील पिकांना भासणारी पाण्याची गरज ओळखून कोरड्या पडलेल्या कृष्णा नदी पात्रात शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याची मागणी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत आमदार यड्रावकर यांनी पाटबंधारे विभागाला संपर्क साधून वारणा धरणातून कृष्णा नदीपात्रात ७०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कृष्णा नदीपात्रात लवकरच पाणी प्रवाहित होणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिकांना पाण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. नदीकाठच्या नागरिकांमध्येही पाण्याबाबत चिंता व्यक्त होत होती. नदीपात्रातील पाणीपातळी कमी झाल्याने तसेच पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके अडचणीत सापडली होती.
या पार्श्वभूमीवर संबंधित शेतकऱ्यांनी आमदार यड्रावकर यांच्याकडे कृष्णा नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी केली.
शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन आमदार यड्रावकर यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार वारणा धरणातून ७०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. हे पाणी शनिवारी सायंकाळपर्यंत नदीपात्रात पोहोचणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी पाणी उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.