करवीरमध्ये शिवसेनेचे 'बोंब मारो' आंदोलन: आयटी रिटर्नच्या निकषावरून रेशन बंद करणाऱ्या शासनाविरोधात आक्रमक पवित्रा
schedule10 Aug 26 person by visibility 150 categoryराजकीय
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील गोरगरीब नागरिकांचे आयटी रिटर्न भरत असल्याच्या कारणावरून बंद करण्यात आलेले रेशन तात्काळ सुरू करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी करवीर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयाच्या दारात जोरदार 'बोंब मारो' आंदोलन आणि निदर्शने करण्यात आली. शासनाच्या या जुलमी धोरणाविरोधात शिवसैनिकांनी सरकारविरुद्ध तीव्र रोष व्यक्त केला.
▪️चुकीच्या निकषांमुळे गोरगरीबांवर अन्याय:
घर बांधताना किंवा वाहन खरेदी करताना बँकेचे कर्ज काढावे लागल्यामुळे अनेक सर्वसामान्य नागरिक, टपरीवाले, भाजी-केळी विक्रेते व अल्पभूधारक यांना सक्तीने आयटी रिटर्न भरावा लागतो. कर भरणारा प्रत्येक व्यक्ती श्रीमंत असतोच असे नाही. परंतु, याच कारणावरून शासनाने गोरगरीबांच्या तोंडचा घास हिरावून घेतल्याचा आरोप शिवसेनेने केला.
▪️अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती:
करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी चुकीचे निकष लावून गोरगरिबांची रेशनिंग बंद का केली? असा जाब विचारत अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. यामुळे तहसील कार्यालयातील अधिकारी पूर्णपणे निरुत्तर झाल्याचे पाहायला मिळाले.
▪️ घोषणाबाजीने परिसर दणाणला:
आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तहसील परिसर दणानून सोडला आणि शासनाचा निषेध केला.
▪️निवेदन व प्रशासकीय आश्वासन:
बाधित रेशनधारकांची बंद केलेली रेशनिंग तात्काळ सुरू करावी, या मागणीचे निवेदन निवासी नायब तहसीलदार भालचंद्र यादव आणि पुरवठा निरीक्षण अधिकारी विलास देसाई यांना सुपूर्द करण्यात आले. यावेळी शिष्टमंडळाला चर्चेदरम्यान, सदर मागणी शासनाकडे पाठवून लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
▪️ उग्र आंदोलनाचा इशारा:
जर बंद केलेले रेशन तात्काळ पूर्ववत सुरू केले नाही, तर यापेक्षाही अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल. गरज पडल्यास कायदा हातात घ्यावा लागला तरी चालेल, पण बाधित रेशनधारकांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, असा आक्रमक इशारा यावेळी शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.
या आंदोलनात करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, शहर प्रमुख विशाल देवकुळे, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख हर्षल पाटील, राहुल गिरुले, बाळासाहेब नलवडे, योगेश लोहार, वीरेंद्र भोपळे, सचिन नागटिळक, शिवाजी लोहार, दीपक फ्रेमवाला, सुनील पारपाणी, संतोष चौगुले, दत्तात्रय विभुते, कैलास जाधव, वसंत पवार, मनोज कुरळे, दिलीप चव्हाण, अभिजीत गुरव, अजित चव्हाण, आबा जाधव, रामराव पाटील, धनंजय पाटील, बाबुराव पाटील, प्रफुल्ल घोरपडे, अकबर फकीर, कृष्णात तुरुके, अशोक कोळी, साहिल देवळे, मोहन रजपूत यांच्यासह अनेक शिवसैनिक, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने बाधित रेशनधारक उपस्थित होते.