‘भारत गौरव पर्यटन ट्रेन’चे कोल्हापूरात आगमन
schedule13 Jun 25 person by visibility 243 categoryराज्य

▪️पर्यटकांचे प्रशासनाकडून स्वागत, आज श्री अंबाबाई मंदिरासह पन्हाळा किल्ल्याला भेट
कोल्हापूर : रेल्वे मंत्रालयाच्या आयआरसीटीसी आणि महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने ‘भारत गौरव पर्यटन ट्रेन’ अंतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट टूर’ हा विशेष उपक्रम सुरू झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली वारशाला मानवंदना देणारा हा उपक्रम पर्यटकांना त्यांच्या जीवनाशी निगडित किल्ले आणि धार्मिक स्थळांचा अविस्मरणीय प्रवास देणार आहेत. या योजनेअंतर्गत पहिली ट्रेन ९ जून २०२५ (शिवराज्याभिषेक दिन) रोजी मुंबई सीएसएमटी स्थानकावरून सुटली. आज पहाटे ४:०० वाजता ही ट्रेन कोल्हापूर रेल्वे स्थानकावर दाखल झाली. यावेळी जिल्हा प्रशासनाने पर्यटकांचे पुष्प देऊन स्वागत केले.
महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाची ओळख व्हावी यासाठी आयआरसीटीसीने महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या सहकार्याने ही विशेष सहल आयोजित केली आहे. सहा दिवसांच्या या प्रवासात पर्यटकांना रायगड, शिवनेरी, प्रतापगड आणि पन्हाळा किल्ल्यांसह निवडक धार्मिक स्थळांना भेटीची संधी मिळाली आहे. प्रवासादरम्यान निवास, प्रवास विमा, जेवण आणि पर्यटनस्थळी फिरण्यासाठी बस सुविधा उपलब्ध आहे.
या सहलीत आतापर्यंत पर्यटकांनी रायगड किल्ला, पुणे येथील लाल महाल, कसबा गणपती, शिवसृष्टी, शिवनेरी किल्ला, भीमाशंकर ज्योतिर्लिंग आणि सातारा येथील प्रतापगड किल्ला पाहिला. आज कोल्हापूरात श्री अंबाबाई मंदिर आणि पन्हाळा किल्ल्याला ते भेट देणार आहेत. या ट्रेनमध्ये ७०० जागांचे आरक्षण झाले आहे.