इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; २ जणांचा बुडून मृत्यू, २५ हून अधिक पर्यटक वाहून गेल्याची भीती
schedule15 Jun 25 person by visibility 341 categoryराज्य

पुणे : पुणे : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील जुना पूल रविवारी (15 जून) दुपारी अचानक कोसळला. या भीषण दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला असून, २५ पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला.
रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने कुंडमळा या प्रसिद्ध पर्यटनस्थळी पर्यटकांची मोठी गर्दी होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास पूल अचानक कोसळला. या वेळी अनेक पर्यटक आणि काही लहान मुले पुलावर उपस्थित होती. पूल कोसळताच अनेकजण थेट नदीत पडले आणि जोरदार प्रवाहात वाहून गेले.
▪️इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त; मदत कार्याला तातडीने वेग
मुंबई : पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकुन अतिशय दुःख झाले. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार २ जणांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.
शोक संदेशात मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, या घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि संबधित तहसीलदार यांच्याशी मी सातत्याने संपर्कात आहे. काही जण वाहून गेल्याने त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. विभागीय आयुक्त घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. घटनास्थळी एनडीआरएफला पाचरण करण्यात आले आहे. मदत कार्याला तातडीने वेग देण्यात आला आहे. 6 जणांना आतापर्यंत वाचविण्यात यश आले आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 32 लोक जखमी झाले, त्यापैकी 6 गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
▪️कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटना दुर्दैवी, वेदनादायी असल्याचे सांगत या दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
दुर्घटनेत काही नागरिक व पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, स्थानिक प्रशासनाने तात्काळ दुर्घटनास्थळी पोहचून बचाव आणि मदतकार्य सुरू केले आहे. जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दलही (NDRF) दुर्घटनेनंतर अल्पावधीतच घटनास्थळी पोचले असून त्यांनीही बचाव व मदतकार्यास सुरुवात केली आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, “कुंडमळा येथे स्थानिक प्रशासनाने तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे. जखमी नागरिकांना आवश्यक सर्व वैद्यकीय उपचार उपलब्ध करण्याचे निर्देशित देण्यात आले आहेत. या पुलाची अवस्था जीर्ण असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असून, देखभालीबाबत कोणतेही दुर्लक्ष झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल,” असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्य शासन या संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिक व त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, जखमींना आवश्यक ती वैद्यकीय मदत शासनामार्फत तातडीने दिली जाईल. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा. आपण सर्वांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले आहे.