अकार्यक्षम व बेजबाबदार EESL कंपनीचा कोल्हापूर महानगरपालीके सोबतचा पथ दिव्यांचा करार रद्द करा
schedule09 Mar 26 person by visibility 129 categoryराजकीय
🟠 भाजपा जिल्हाध्यक्ष, नगरसेवक विजय जाधव यांचे आयुक्तांना निवेदन
कोल्हापूर : शहरातील पथ दिव्यांबाबत आज भाजपा जिल्हाध्यक्ष, नगरसेवक विजय जाधव यांनी आयुक्तांकडे निवेदन देऊन EESL कंपनीचा कोल्हापूर महानगरपालीके सोबतचा पथ दिव्यांबाबतीत करार रद्द करून नवीन कंपनीसोबत करार करण्यात यावा याविषयात निवेदन सादर केले.
शहरातील पथ दिव्यांबाबत कोल्हापूर महानगरपालिका आणि EESL कंपनीचा २०१९ साली करार करण्यात आलेला होता. ७ वर्षांच्या या करारामध्ये दिव्यांची देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी संबंधित कंपनीची असून यासाठी दर महिन्याला ३५ लाख १७४६५/- रुपये महापालिकेने देण्याचे ठरले होते. हि रक्कम मनपाने वेळोवळी दिल्याचे समजते. तसेच आज पर्यंत या कंपनीला १७ कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. परंतु पथदिवे देखभाल दुरुस्ती विषयात कंपनीचा भोंगळ कारभार, नागरिकांच्या तक्रारी असून याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
उपरोक्त विषयास अनुसरून सध्या कोल्हापूर मनपा कार्यक्षेत्रामध्ये ३८००० पथदिवे आहेत. त्यापैकी अंदाजे २५०० पथदिवे बंद आहेत किमान ४००० पथदिवे पिवळे पडले आहेत त्या दिव्यांचा उजेड रस्त्यावर पडतच नाही असे आहेत. सदर कंपनीला (EESL) वेळोवेळी पाठपुरावा केला असता वेळकाढू पणा, अकार्यक्षमता निदर्शनास येत आहे. पथदिवे बंद असलेमुळे चोरी, अपघात तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. शहरातील बंद पथदिवे तात्काळ सुरू होणे आवश्यक आहे.
त्यामुळे EESL कंपनीचे कामकाज असमाधानकारक असलेने त्यांचे सोबत असणारा म.न.पा. चा ७ वर्षांचा करार तात्काळ रद्द करण्यात यावा व संदर्भीय पत्रानुसार महाराष्ट्रातील इतर महानगरपालीका मध्ये ज्या पध्दतीने नवीन कंपनीसोबत शासनामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या BAC इन्फ्राटेक प्रा. लि. व व्हिन्सी ग्लोबल प्रा. लि. या कंपनीसोबत तात्काळ करार करण्यात यावा व शहरामध्ये बंद असणारे पथदिवे दुरुस्त / बदलणेबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.