उच्च गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उत्साहात प्रवेश
schedule04 Aug 26 person by visibility 270 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी (डिग्री इंजिनिअरिंग) प्रवेश प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, उच्च गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांनी इन्स्टिट्यूटला पसंती दिल्याचे दिसून येत आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यापकवर्ग, उद्योगाभिमुख शिक्षणपद्धती आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रम यांमुळे इन्स्टिट्यूटवरील विद्यार्थी व पालकांचा विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
प्रथम वर्ष अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेतलेल्या प्रिया शारबीद्रे (92%),अनुष्का शिंदे (91.06 % ) आणि सुरज साठे (90.49%) या विद्यार्थ्यांचे संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी आणि इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले.
यावेळी विद्यार्थी व पालकांनी संस्थेच्या शैक्षणिक वातावरणाची, सुविधांची आणि प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाची माहिती घेत समाधान व्यक्त केले. संस्थेच्या विविध विभागांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
संचालक भिर्डी म्हणाले, "डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ही केवळ शिक्षण देणारी इन्स्टिट्यूट नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी केंद्र आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना यशस्वी अभियंते घडविण्याचे कार्य इन्स्टिट्यूट सातत्याने करत आहे. उच्च गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांनी संस्थेवर दाखविलेला विश्वास हा आमच्यासाठी अभिमानाचा विषय असून, विद्यार्थ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही अधिक उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहोत."
प्राचार्य डॉ. सपाटे यांनी सांगितले, "संस्थेतील अनुभवी शिक्षक, सुसज्ज प्रयोगशाळा, आधुनिक अध्यापन पद्धती, रोजगाराभिमुख उपक्रम आणि विद्यार्थ्यांशी असलेले स्नेहपूर्ण नाते यामुळे आमच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व व्यावसायिक यशाचा आलेख सातत्याने उंचावत आहे."
नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनीही संस्थेतील सकारात्मक वातावरण, प्रशस्त परिसर, आधुनिक सुविधा आणि स्वागताचा अनुभव याबद्दल आनंद व्यक्त केला. "आम्हाला अशा गुणवत्तापूर्ण ठिकाणी प्रवेश मिळाल्याचा अभिमान वाटत असून, येथे शिक्षण घेऊन उत्कृष्ट अभियंता बनण्याचे आमचे स्वप्न निश्चित पूर्ण होईल," अशी भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
इन्स्टिट्यूटने गेल्या अनेक वर्षांपासून उत्कृष्ट शैक्षणिक परंपरा, शिस्त, गुणवत्तापूर्ण निकाल, क्रीडा, सांस्कृतिक व तांत्रिक उपक्रमांमधील उल्लेखनीय कामगिरी यामुळे विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळेच दरवर्षी गुणवंत विद्यार्थी या संस्थेला प्राधान्य देत असून, यंदाही त्याची प्रचिती प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत दिसून आली. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी रजिस्ट्रार अमित आवाड , प्रा. डॉ. करण पाटील, प्रवेशप्रक्रिया प्रमुख प्रा. प्रवीण देसाई, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.