ज्ञानतपस्वी हरपले! शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन
schedule04 Aug 26 person by visibility 199 categoryराज्य
कोल्हापूर : महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सामाजिक पटलावर सुवर्णअक्षर कोरणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, त्रिपुरा, बिहार व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील (दादा) यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी कोल्हापुरातील 'ज्ञानशांती' निवासस्थानी मंगळवारी सकाळी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचवणारे एक महान पर्व संपले आहे.
तळागाळातून राजकीय प्रवास सुरू करणारे डी. वाय. पाटील १९६७ आणि १९७२ मध्ये पन्हाळा मतदारसंघातून विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. त्यांच्या निष्ठावंत सेवेची दखल घेऊन नोव्हेंबर २००९ मध्ये त्यांची त्रिपुराच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी बिहार आणि पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाची धुराही समर्थपणे सांभाळली.
महाराष्ट्रात तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाचे खासगीकरण करून ते सामान्यांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचे योगदान अग्रगण्य राहिले. १९८३ मध्ये नवी मुंबईत पहिली अभियांत्रिकी संस्था स्थापन करून त्यांनी शैक्षणिक साम्राज्याची रोवणी केली. आज त्यांच्या डी. वाय. पाटील समूहाअंतर्गत पुणे, पिंपरी, नवी मुंबई आणि कोल्हापुरात अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषीसह अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्था कार्यरत आहेत.
शिक्षणाइतकीच आरोग्य व क्रीडा क्षेत्रातही त्यांनी मोलाची भर घातली. नवी मुंबई, पुणे व कोल्हापुरात सुपर स्पेशालिटी चॅरिटेबल हॉस्पिटल्सद्वारे गरजूंना मोफत आरोग्यसेवा दिली, तसेच जागतिक दर्जाचे 'डी. वाय. पाटील स्टेडियम' उभारले. १९९१ मध्ये त्यांना 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. शेगावच्या श्री गजानन महाराजांचे निस्सीम भक्त असलेल्या त्यांच्या निधनाने एका महान ज्ञानतपस्वीला महाराष्ट्राने मुकले आहे.