गव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, राधानगरी तालुक्यातील घटना
schedule08 Jun 25 person by visibility 223 categoryगुन्हे

कौलव : आपटाळ पैकी कुदळवाडी (ता. राधानगरी) येथील भिकाजी गुंडू बेरकळ (वय ५९) हे शेतीकाम व शेताकडे पाणी पाजण्यासाठी गेले असता गवा रेड्याने केलेल्या हल्ल्यात जागीच ठार झाले. ही घटना आज (दि.८) सकाळी साडे आठच्या सुमारास घडली. बेरकळ ग्रामपंचायतचे निवृत्त कर्मचारी होते.
भिकाजी बेरकळ आज सकाळी साडेआठच्या सुमारास गट क्रमांक ९७ मध्ये शेती कामासाठी गेले होते. मात्र, ते साडेदहा वाजेपर्यंत परत न आल्यामुळे त्यांचा मुलगा शिवाजी त्यांना शोधण्यासाठी गेला. त्याला ते मृतावस्थेत आढळून आले. शिवाजी यांनी तत्काळ वन विभागाला कळवले. गवा रेड्याच्या पाऊल खुणा व मृताच्या अंगावरील व्रण यावरून गवा रेड्याच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रथम दर्शनी स्पष्ट झाले.
यावेळी वनक्षेत्रपाल विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करून त्याची माहिती राधानगरी पोलीस ठाण्याला दिली. मृताचे राधानगरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.