महास्ट्राईड' प्रकल्पांतर्गत जिल्हा विकास आराखडा अंमलबजावणीत कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम
schedule19 Aug 26 person by visibility 149 categoryराज्य
◼️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांमध्ये विकासाला चालना देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या "संस्थात्मक क्षमता बळकटीकरण प्रकल्प (महास्ट्राईड)" अंतर्गत आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या जिल्हा विकास आराखडा (DSP) अंमलबजावणीत कोल्हापूर जिल्ह्याने शंभर टक्के गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या अभूतपूर्व यशाबद्दल १५ ऑगस्ट २०२६ रोजी ८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचा विशेष गौरव व अभिनंदन करण्यात आले.
"महाराष्ट्र राज्याच्या एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था आणि विकसित महाराष्ट्र २०४७ या महत्त्वाकांक्षी संकल्पनेला बळ देणारा तसेच कृषी, उद्योग, पायाभूत सुविधा, पर्यटन आणि ग्रामीण विकासाचा समतोल साधत कोल्हापूरने विकसित महाराष्ट्र ध्येय साध्य करण्याकरिता पाऊल टाकले आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.
स्वतंत्र पडताळणी संस्थेकडून मूल्यांकन गेल्या महिन्यात केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्वतंत्र पडताळणी संस्थेमार्फत (IVA) जिल्हा विकास आराखड्यातील विविध प्रकल्प, पायाभूत सुविधा, सामाजिक कल्याण योजना, आर्थिक तरतुदींचा विनियोग आणि ध्येयपूर्तीचे कडक निकषांवर मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने पारदर्शक अंमलबजावणी, वेळेत प्रकल्पपूर्ती, निधीचा प्रभावी वापर आणि खाजगी गुंतवणूक या सर्व क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करत शंभर टक्के गुण मिळवल्याची माहिती 'डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक युनिट'चे जिल्हा प्रमुख डॉ. अरुण धोंगडे यांनी दिली.
सांघिक प्रयत्नांचे फळ पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर, सर्व सन्माननीय खासदार, आमदार, जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनामुळे व सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे हे यश मिळाले आहे.
शासन निर्णय व अधिकृत पत्रानुसार मिळालेल्या या मान्यतेमुळे जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला आहे व भविष्यातही शाश्वत व सर्वसमावेशक विकासाची हीच गती कायम ठेवण्याचा संकल्प श्री. विक्रम देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपायुक्त सीमा आर्दाळकर, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी अमित सुतार, सागर पाटील, गोपाळ निगवेकर, संदीप फुलारी, किरण मोरे, पांडुरंग लाड व इतर कर्मचारी उपस्थित होते.