कागल मधील निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांनी माफ करावे : भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील
schedule18 Nov 25 person by visibility 145 categoryराजकीय
कोल्हापूर : कागल नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या नेतृत्वा खाली नगराध्यक्ष पदांसह जवळपास 15 नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले होते .या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून मित्र पक्षांबरोबर युती करून पूर्ण तयारीनिशी निवडणूक लढवावी , अशी अपेक्षा इथल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली होती. युती नाही झाली तरी भाजप म्हणून स्वबळावर लढण्याची तयारी भाजपा कार्यकर्त्यांनी केली होती .अशा परिस्थितीमध्ये काल अचानक भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून भारतीय जनता पार्टीच्या कागल नगरपालिकेतील उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज ए .बी .फॉर्मसह दाखल करू नयेत , असा आदेश आला होता .
हा आदेश प्रमाण म्हणून कागल मधल्या माजी आमदार संजयबाबा घाटगे आणि भाजपच्या सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आपले उमेदवारी अर्ज ए .बी . फार्म उपलब्ध असतानाही अर्ज दाखल केले नाहीत . खरे तर या निर्णयाने कागल मधील भाजपाचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झालेले आहेत .त्यांची नाराजी भाजपचा जिल्हाध्यक्ष या नात्याने मी समजू शकतो.पण पक्षाच्या शिस्तीप्रमाणे कागल मधल्या या सर्व निष्ठावंत प्रामाणिक कार्यकर्त्यांनी पक्षाची शिस्त प्रमाण म्हणून आलेल्या आदेशाचे प्रामाणिकपणे पालन केले एक कार्यकर्ता म्हणून या कागल मधील सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानावे तेवढे थोडेच आहेत .
भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेतृत्वने पक्षाचे उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा घेतलेला निर्णय हा पूर्ण विचारांतीच घेतलेला असेल याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही .पण निवडणूक लढवण्याची पूर्वतयारी करून कागल मधील कार्यकर्त्यांना यापासून वंचित रहावे लागते यासारखे कार्यकर्त्यांच्या दृष्टीने मोठे दुर्दैव नाही.तरीसुद्धा कागल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेली तयारी ,आणि पक्षाचे केलेले प्रामाणिक काम याबद्दल या कार्यकर्त्यांना सलाम करावा तेवढा थोडाच आहे .पण पक्षादेश आल्याने या कार्यकर्त्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल न करता दाखवलेली पक्षावरची निष्ठा ही वाखाणण्याजोगी आहे .
निवडणुकीची पूर्वतयारी करून ही त्यांना या निवडणुकीपासून थांबावे लागते यामुळे कागल मधील सर्व कार्यकर्त्यांना झालेला त्रास त्यांना झालेला यातना याबद्दल पक्षाचा जिल्हाध्यक्ष या नात्याने मी सर्व कार्यकर्त्याची मनापासून दिलगीरी व्यक्त करतो .कागल शहरातील भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मोठ्या मनाने आम्हाला माफ करावे अशी विनंती भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केली आहे.