पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणची 15.40 कोटींची कामे पुर्ण
schedule19 Apr 26 person by visibility 78 categoryराज्य
▪️विविध विकास कामांचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
▪️भुदरगड तालुक्यातील 3078 शेतकऱ्यांना मिळते दिवसा वीज
कोल्हापूर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणच्या गारगोटी व राधानगरी उपविभागात विविध विकास कामे झाली आहेत. यातील मुदाळ तिट्टा (ता. भुदरगड) व कडगाव उपकेंद्र, तिरवडे (ता. भुदरगड) येथील कामांचे लोकार्पण मान्यवर लोकप्रतिनिधींच्या हस्ते आज संपन्न झाले. शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 मधून नव्याने पुर्ण झालेल्या कामांमुळे भुदरगड तालुक्यातील 3078 शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असून त्यांचे जीवनमान अधिक सुखकर होणार आहे.
मुदाळ तिट्टा व तिरवडे येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमास विविध मान्यवर व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने केडीसीसी बॅंक संचालक अर्जुन आबिटकर, जिल्हा परिषद बांधकाम समिती सभापती सारिका नांदेकर, भुदरगड पंचायत समिती सभापती विक्रमसिंह पाटील, उपसभापती अरुणा देसाई, सदस्य धनंजय लाड, सुनील किरोळकर, मुदाळ सरपंच राजनंदिनी पाटील, तिरवडे सरपंच शुभांगी जाधव, मानसिंगराव पाटील, बाबा नांदेकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता (प्रभारी) दत्तात्रय भणगे यांची उपस्थिती होती.
राज्य शासनाकडून नागरिकांचे व प्रामुख्याने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याकरिता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 राबवण्यात येत आहेत. या योजनेतून महावितरणने जिल्ह्यात अनेक विकास कामे केली आहेत. यामधील मुदाळ तिट्टा उपकेंद्राची 5 एमव्हीए क्षमतेचे रोहित्र बसवून क्षमता वाढ करण्यात आली आहे, तर कडगाव उपकेंद्र तिरवडे येथे 4 मेगावॉट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्यात आला आहे. या दोन्ही कामांचे लोकार्पण आज मान्यवर लोकप्रतिनिधींच्या हस्ते संपन्न झाले.
मुदाळतिट्टा उपकेंद्राची 5 एमव्हीए क्षमतेचे रोहित्र बसवून क्षमता वाढ करण्याकरता 1.40 कोटींचा खर्च आला आहे. यामुळे 13 गावांतील 1568 शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. तर कडगाव उपकेंद्र तिरवडे येथे 4 मेगावॉट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्याकरता सुमारे 14 कोटींचा खर्च आला आहे. या उपकेंद्रातून 22 गावांतील 1510 शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. अत्यंत कमी वेळेत हा प्रकल्प पुर्ण केल्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींकडून महावितरण अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव केला. या दोन्ही लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमांस महावितरण कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.