बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करा; महायुतीचे सर्व पक्षांना आवाहन
schedule04 Apr 26 person by visibility 92 categoryराज्य
मुंबई : ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन महायुतीच्या नेत्यांनी केले आहे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आणि परंपरेचा मान राखत सर्व पक्षांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात बोलताना आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीचा दाखला दिला. त्यावेळी भाजपने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता, याची आठवण करून देत त्यांनी बारामतीची निवडणूकही त्याच धर्तीवर बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. "ही निवडणूक बिनविरोध झाली तर ती महाराष्ट्राला साजेसी ठरेल," असे मत त्यांनी व्यक्त केले.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, त्यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्याशी संपर्क साधून ही निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली आहे. अजित पवार यांनी आपल्या कारकिर्दीत सर्वाधिक काळ काँग्रेससोबत काम केले आहे, त्यामुळे जनतेच्या भावनांचा आदर करत काँग्रेसने सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यावा, असे त्यांनी म्हटले. उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे.
दुसरीकडे, काँग्रेसने मात्र या मतदारसंघात उमेदवार देण्याचे संकेत दिले आहेत. नाना पटोले यांनी सांगितले की, निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमचीही भावना आहे, परंतु अंतिम निर्णय पक्षाचे हायकमांड घेतील. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजपकडून अद्याप कोणताही अधिकृत प्रस्ताव आला नसल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले असून, उद्यापर्यंत उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल असेही त्यांनी नमूद केले.