हुपरी-कोल्हापूर राज्य मार्गावरील खड्डे तात्काळ मुजवा; शिवसेनेचा आक्रमक पवित्रा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
schedule31 Jul 26 person by visibility 128 categoryसामाजिक
कोल्हापूर : हुपरी-कोल्हापूर राज्य मार्गावरील उचगांव आणि गडमुडशिंगी परिसरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, हे खड्डे तात्काळ मुजवावेत, अशी आक्रमक मागणी करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपअभ्यांत्यांना देण्यात आले असून, प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
हुपरी-कोल्हापूर हा अत्यंत महत्त्वाचा राज्य मार्ग असून, या मार्गावरून हुपरी, पट्टणकोडोली, मुडशिंगीसह फाईव्ह स्टार एमआयडीसी आणि कर्नाटकात मोठी वाहतूक होते. तसेच शाळा-कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी, लहान मुलांच्या रिक्षा आणि कामावर जाणारे दुचाकीस्वार यांची या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर सतत ये-जा असते.
सध्या पावसाळ्यात उचगांव, गडमुडशिंगी परिसर आणि इतर ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने दुचाकी चालकांची मोठी कसरत होत आहे. पाण्यामुळे खड्डा न दिसल्याने अनेकदा अपघात होत आहेत. अचानक ब्रेक दाबल्यामुळे वाहनांचे नुकसान होत असून वाहनधारकांमध्ये वादावादीचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे या मार्गावरील खड्डे तात्काळ मुरूम टाकून मुजवावेत आणि पावसाळ्यानंतर या रस्त्याचे डांबरीकरण करावे, जेणेकरून दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा प्रवास सुखकर होईल, अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
शिष्टमंडळाच्या निवेदनाची दखल घेत, अधिकाऱ्यांनी उद्यापासूनच रस्त्यावर मुरूम टाकून खड्डे बुजवून घेण्यात येतील आणि पावसाळ्यानंतर डांबरीकरण केले जाईल, असे आश्वासन दिले आहे.
या शिष्टमंडळात जिल्हाप्रमुख विराज पाटील, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, फेरीवाला संघटना उपतालुकाप्रमुख बाळासाहेब नलवडे, प्रकाश मुदुगडे, उपशाखाप्रमुख सुनील पारपानी, अजित चव्हाण, युवा सेना समन्वयक सचिन नागटिळक, विभाग प्रमुख दीपक फ्रेमवाला, गांधीनगर उपप्रमुख दीपक पोपटाणी, विभाग प्रमुख विनोद रोहिडा, प्रसन्न आवटे, अरुण अब्दागिरी यांच्यासह अनेक शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.