महाराष्ट्र पोलीस दलाची पन्हाळगड ते विशाळगड पदभ्रमंती मोहीम यशस्वी
schedule16 Aug 26 person by visibility 111 categoryसामाजिक
कोल्हापूर : महाराष्ट्र पोलीस दलाने ऐतिहासिक वारसा जपत आणि वीरांच्या शौर्याची प्रेरणा घेत 'पन्हाळगड ते विशाळगड' ही ६५ किमीची पदभ्रमंती मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. १४ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेत १५० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.
महाराष्ट्र राज्याला लाभलेल्या ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, वीरांच्या शौर्याची परंपरा आणि त्यांनी राष्ट्रनिर्मितीसाठी दिलेल्या योगदानाची माहिती पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांना व्हावी, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. याद्वारे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये साहसी वृत्ती निर्माण करून त्यांची शारीरिक व मानसिक क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या मोहिमेची सुरुवात १४ ऑगस्ट रोजी पन्हाळगड येथील नरवीर बाजीप्रभू देशपांडे चौकातून झाली. विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा आणि पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या उपस्थितीत मोहिमेला प्रारंभ झाला. पदभ्रमंती कुंभारवाडी, मांडलाईवाडी, करपेवाडी, पाटेवाडी फाटा, म्हालसवडे, धनगरवाडा आणि पावनखिंड मार्गे जात १५ ऑगस्ट रोजी विशाळगडच्या मुंडा दरवाजा येथे पोहोचली.
पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या संकल्पनेतून ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत ३० महिला पोलीस अंमलदारांसह एकूण १५० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. ऐतिहासिक पावनखिंड संग्राम, शौर्याच्या कथा आणि गड-किल्ल्यांचा इतिहास यांची उजळणी करत ही मोहीम यशस्वीरीत्या संपन्न झाली.