उंचगाव येथे वीज बिल भरणा केंद्र तातडीने सुरू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा शिवसेनेचा इशारा
schedule31 Aug 26 person by visibility 125 categoryसामाजिक
उंचगाव: करवीर तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या आणि १५ ते १६ हजार वीज ग्राहकसंख्या असलेल्या उंचगाव येथे तात्काळ अधिकृत वीज बिल भरणा केंद्र सुरू करावे, अशी ठाम मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) करवीर तालुक्याच्या वतीने महावितरण प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
उंचगाव आणि सरनोबतवाडी परिसराची लोकसंख्या सुमारे ५० ते ६० हजारांच्या घरात असूनही येथे हक्काचे वीज बिल भरणा केंद्र नाही.
येथील नागरिकांना बिल भरण्यासाठी दूरवरच्या गडमुडशिंगी येथे जावे लागते, जिथे पेमेंट स्वीकारण्याबाबत मर्यादा आहेत.
अनेक घरांमध्ये तरुण मुले बाहेरगावी कामानिमित्ताने राहत असल्याने वृद्ध नागरिकांना बिल भरण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतो.
सर्वच ग्राहक फोन पे किंवा गुगल पे सारख्या ऑनलाइन माध्यमांचा वापर करू शकत नाहीत.
गडमुडशिंगीचे अंतर जास्त असल्याने वेळेत बिल न भरल्यास महावितरणकडून वीज कनेक्शन कापले जाण्याची भीती असते.
शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
याप्रकरणी करवीर तालुका शिवसेनेच्या शिष्टमंडळाने वीज वितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. उंचगावचा विस्तार मोठा असताना ग्राहकांना विनाकारण दुसऱ्या गावी का पाठवता, असा संतप्त सवाल यावेळी करण्यात आला.
◼️ "उंचगावची लोकसंख्या आणि ग्राहकांची संख्या मोठी आहे. सर्वजण मुडशिंगी येथे जाऊ शकत नाहीत, त्यामुळे ग्राहकांची होणारी परवड थांबवण्यासाठी उंचगावमध्येच बिल भरण्याची सोय करा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल."
— राजू यादव (करवीर तालुकाप्रमुख)
या मागणीचे निवेदन हुपरी वीज वितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता रोहित जयंत कुलकर्णी आणि उंचगाव कार्यालयाचे सहायक अभियंता संदीप शिवाजी काकडे यांना सुपूर्द करण्यात आले.
शिष्टमंडळाच्या आक्रमक भूमिकेनंतर महावितरण अधिकाऱ्यांनी चालू सप्टेंबर महिन्या अखेरपर्यंत उंचगावमध्ये अधिकृत वीज बिल भरणा केंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिले. तसेच, तोपर्यंत उंचगाव कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांचे बिल अधिकाऱ्या स्वतः ऑनलाइन जमा करून घेतील व कोणाचीही गैरसोय होऊ देणार नाही, अशी दक्षता घेण्याचे मान्य केले.
निवेदन व आंदोलनावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, बाळासाहेब नलवडे, युवासेना तालुकाप्रमुख योगेश लोहार, दत्ता फराकटे, संतोष चौगुले, दीपक पोपटानी, सुनील पारपाणी, सागर पाटील, शिवाजी लोहार, विनोद रोहिडा, कृष्णात तुरुके, वसंत पोवार, धनंजय पाटील, आबा जाधव, सचिन गुरव, सागर यादव, मोहन रजपूत, ओकार फराकटे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.