शिक्षण व्यवस्थेतील गोंधळ आणि पेपरफुटीचा भडका: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा; शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांचा मूक मोर्चा
schedule20 Jul 26 person by visibility 377 categoryराज्य
कोल्हापूर : देशातील शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकार आणि 'नीट' (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी बळजबरीने उचलल्याने संतापाची लाट उसळली आहे. या दडपशाहीच्या निषेधार्थ आता राज्यभरातून आंदोलनाला पाठिंबा मिळत असून, कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात सोमवारी विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत मुकमोर्चा काढला.
शिक्षण क्षेत्रातील पेपरफुटीचे सत्र थांबत नसून, सेट (SET), सारथी, बार्टी, महाज्योती यांसारख्या महत्त्वाच्या परीक्षांचे पेपर फुटल्याने लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. "आम्ही फक्त देणाऱ्यांनाच बोलत नाही, तर घेणारे आणि पेपर विकणारे तेवढेच जबाबदार आहेत," अशी संतप्त भावना व्यक्त करत विद्यार्थ्यांनी या व्यवस्थेतील पारदर्शकतेची मागणी केली आहे. सोनम वांगचुक आणि अभिजीत टिपके यांच्या आंदोलनाकडे सरकार जाणूनबुजून दुर्लक्ष करत असून, ही दडपशाही लोकशाहीसाठी घातक असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.
सोनम वांगचुक यांच्यासारख्या शिक्षणतज्ज्ञांना ज्या पद्धतीने उपोषणावरून हलवण्यात आले, ती कृती अत्यंत चुकीची आणि सरकारची असवेदनशीलता दर्शवणारी आहे. जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आमचा हा लढा सुरूच राहील, असा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. पेपरफुटीच्या या चक्रात लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा होत असताना, सरकार गप्प का? असा संतप्त सवाल विचारत आता हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.