इंधन टंचाईच्या चर्चा केवळ अफवा; कोल्हापुरात 'पॅनिक बायिंग' टाळण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे स्पष्ट निर्देश
schedule24 Mar 26 person by visibility 133 categoryराज्य
कोल्हापूर : जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत असून नागरिकांनी 'पॅनिक बायिंग' करू नये, असे स्पष्ट आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून इंधन टंचाईच्या चुकीच्या अफवा पसरल्याने पेट्रोल पंपांवर नागरिकांची मोठी गर्दी उसळली आहे. या विनाकारण भीतीमुळे जिल्ह्यात इंधन विक्रीत अचानक २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली असून, प्रशासकीय यंत्रणेवर विनाकारण ताण निर्माण झाला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, आयओसीएल, एचपीसीएल आणि बीपीसीएल या तिन्ही कंपन्यांकडे पुरेसा बफर स्टॉक उपलब्ध असून पुरवठा साखळी नियमित सुरू आहे. जिल्ह्यातील ४ ते ५ टक्के पंप तांत्रिक कारणांमुळे बंद असले तरी त्याचा तुटवड्याशी कोणताही संबंध नाही. एकट्या बीपीसीएलच्या ११९ पंपांवरून काल ३०० किलोलीटर पेट्रोल आणि ३२० किलोलीटर डिझेलची विक्रमी विक्री झाली आहे, जी केवळ अफवांचे फलित आहे.
इंधनासोबतच एलपीजी गॅसचा पुरवठाही सुरळीत असून नागरिकांनी केवळ गरजेनुसारच बुकिंग करावे, असे प्रशासनाने सूचित केले आहे. नागरिकांनी जबाबदार राहून गर्दी टाळावी आणि काही तक्रार असल्यास ०२३१-२६५५५७९ किंवा ८३९०७३२०२६ या व्हॉट्सअॅप हेल्पलाइनवर संपर्क साधावा. असे आवाहन केले आहे


