खेत बचाव अभियान अंतर्गत कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे प्रशिक्षण
schedule04 Jun 26 person by visibility 97 categoryसामाजिक
कोल्हापूर : श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र, कणेरी व कृषी विभाग, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने "खेत बचाव अभियान" अंतर्गत कृषी निविष्ठा विक्री केंद्रांच्या प्रतिनिधींसाठी खतांचा संतुलित वापर व खत विक्री व्यवस्थापन प्रणाली या विषयांवर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. रवींद्र सिंह हे होते. प्रमुख उपस्थितांमध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. जालिंदर पांगारे, उपस्थित होते. तसेच उपविभागीय कृषी अधिकारी श्री. अरुण भिंगारदिवे, मोहीम अधिकारी श्री. सुशांत लवटे, विषय विशेषज्ञ मृदा शास्त्र , श्री राजेंद्र वावरे, तालुका कृषी अधिकारी श्री. शेखर थोरात, श्री. युवराज पाटील, गुणनियंत्रण निरीक्षक श्रीम. सुनीता वाघमोडे व श्री. नितीन भांडवले, श्री सतीश देशमुख व श्रीम. गौरी जंगम यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकामध्ये डॉक्टर रवींद्र सिंग सर यांनी खेत बचाव अभियान अंतर्गत विविध मोहिमा व त्यांची गरज याविषयी उपस्थित त्यांना संबोधित केले. तसेच त्यांनी नैसर्गिक शेती काळाची गरज बनणार आहे व त्या दृष्टीने आपल्या सर्वांचे प्रयत्न असावेत असेही आव्हान सर्व उपस्थितांना केले.
जालिंदर पंगारे यांनी कोल्हापूर जिल्ह्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर केंद्र शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या खत विक्री व्यवस्थापन प्रणाली चे महत्व व या प्रणाली अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेते चांगलं काम करून शेतकऱ्यांना योग्य वेळेत खत उपलब्ध करून देतील व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी जबाबदारीने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मार्गदर्शनाच्या मुख्य सत्रामध्ये श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ, राजेंद्र वावरे यांनी "खतांचा संतुलित वापर" या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, रासायनिक खतांचा असंतुलित व अतिरेकी वापर केल्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत असून उत्पादन खर्च वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना माती परीक्षण अहवालाच्या आधारेच खतांचा वापर, खतांचा संतुलित व एकात्मिक वापर तसेच सेंद्रिय खतांचा वापर, जैविक खते यांचा योग्य वापर, पिकनिहाय शिफारशीनुसार खत व्यवस्थापन आणि एल-निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर पीक पोषण व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट केले. कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना संतुलित खत वापराबाबत योग्य मार्गदर्शन करून मृदा आरोग्य जपण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मोहीम अधिकारी सुशांत लवटे यांनी "खत विक्री व्यवस्थापन प्रणाली" (Framework For Fertilizer Sale) या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांना योग्य प्रकारचे व शिफारशीनुसार खत उपलब्ध करून देण्याचे महत्त्व विषद केले. खत विक्री व्यवस्थापन प्रणालीमुळे खतांचा पुरवठा, वितरण व वापर यामध्ये पारदर्शकता निर्माण होणार असून शेतकऱ्यांना वेळेत व योग्य प्रमाणात खते उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या प्रणाली च्या ॲपची सविस्तर माहिती उपस्थित सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांना दिले.
कार्यक्रमात उपस्थित कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी विविध शंकांचे निरसन करून घेतले. खतांचा संतुलित वापर, मृदा आरोग्य संवर्धन व शाश्वत शेती विकासासाठी कृषी निविष्ठा विक्रेते हे महत्त्वाचे दुवा असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. खेत बचाओ अभियान पूर्ण देशभर १ जून ते 30 जून या कालावधीमध्ये राबवण्यात येत आहे.
कार्यक्रमास करवीर व कागल तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. सुनील कुमार यांनी केले.