मुंबई : T20 विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाचे स्वागत करण्यासाठी, मुंबईतील मरीन ड्राइव्ह येथे विजय परेडचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये लाखो क्रिकेट चाहते जमले होते. भारतीय क्रिकेट संघ पाहण्यासाठी आणि खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी मरीन ड्राईव्हवर जमलेल्या क्रिकेट चाहत्यांच्या गर्दीत अनेकांना आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागले.
किमान 10 जणांना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मुंबई पोलिसांनी सांगितले की, ज्या चाहत्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले त्यांच्यापैकी अनेकांना फ्रॅक्चर झाले होते आणि इतरांना श्वास घेण्यास त्रास होत होता. मुंबई पोलिसांनी सांगितले की, जवळच्या सरकारी रुग्णालयात (जीटी हॉस्पिटल) उपचारासाठी नेण्यात आलेल्या 10 पैकी 8 जणांना काही वेळाने घरी सोडण्यात आले. दोन जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मरीन ड्राइव्हवर तीन किलोमीटरच्या पट्ट्यात क्रिकेट चाहत्यांचा फक्त निळासागर दिसत होता, कारण प्रत्येकाने भारतीय क्रिकेट संघाची जर्सी घातली होती. विजय परेडनंतर भारतीय क्रिकेट संघ वानखेडे स्टेडियमवर पोहोचला तेव्हा हजारो चाहत्यांनी खेळाडूंचे जोरदार स्वागत केले.