टाकळी येथे औद्योगिक वसाहतीसह सैनिकांच्या सर्व मागण्या पूर्ण करणार : नामदार उदय सामंत
schedule18 Aug 26 person by visibility 96 categoryराज्य
मुंबई : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातील टाकळी परिसरात शासकीय औद्योगिक वसाहत उभारण्याबरोबरच त्या परिसरातील माजी सैनिकांनी मागणी केलेल्या सर्व मागण्या महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातील अशी ग्वाही उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांनी दिली,
टाकळी येथील शासकीय औद्योगिक वसाहती संदर्भात मंत्रालयात नामदार उदय सामंत यांच्या दालनात मंगळवारी बैठक पार पडली, बैठकीस तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर प्रमुख उपस्थित होते,
ग्रामीण भागातील युवक उद्योजक झाला पाहिजे, परिसरातील महिलांना गावाशेजारी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या पाहिजेत त्याचबरोबर बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उद्योगांचा विस्तार झाला पाहिजे आणि त्यासाठी शासकीय औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या पाहिजेत असे सांगताना माजी सैनिकांच्या मागण्याकडे देखील दुर्लक्ष केले जाणार नाही त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जातील असेही नामदार सावंत यांनी बैठकीत सांगितले, बैठकीत गायरान जमिनीवरील अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित झाला. यावेळी शासकीय गायरान जमिनीवर शेतीचे जे अतिक्रमण झाले आहे ते तातडीने काढून घेण्याच्या सूचना नामदार उदय सामंत यांनी बैठकीसाठी ऑनलाइन उपस्थित असणाऱ्या कोल्हापूर जिल्हाधिकारी विजय राठोड यांना दिल्या, यावेळी उद्योग, महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सैनिकांचे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते.