बळीराजाला मोठा दिलासा: अस्मानी संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार वाऱ्यावर सोडणार नाही : मुख्यमंत्री
schedule05 Apr 26 person by visibility 115 categoryराज्य
मुंबई : गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बळीराजाला मोठा आधार दिला असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत केली जाईल, अशी ग्वाही दिली आहे.
महाराष्ट्रात कुठेही अवकाळी पाऊस किंवा नैसर्गिक आपत्ती आल्यास शासन तत्परतेने काम करत असून, याही घटनेत तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, पंचनामे पूर्ण होताच बाधित शेतकऱ्यांपर्यंत योग्य ती आर्थिक मदत पोहोचवली जाईल. कोणतीही तांत्रिक अडचण मदतीच्या आड येऊ दिली जाणार नाही आणि राज्यातील एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नैसर्गिक संकटामुळे खचलेल्या शेतकऱ्यांनी धीर धरावा, सरकार पूर्ण ताकदीनिशी तुमच्या पाठीशी उभे आहे, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.