SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात २७ एप्रिलला महागाईविरोधात रेशन बचाव समितीचा धडक मोर्चा; हजारो नागरिक रस्त्यावर उतरणारसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये आयटीआय जॉब फेअर ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४५० विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवडआप युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी मोईन मोकाशी यांची निवडपुस्तक : मानवी भावना, ज्ञान आणि संस्कृतीच्या संवादाचे प्रभावी माध्यमइंग्रजी भाषा दिन: जागतिक संवादाचे माध्यम'नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल'चे नियम धाब्यावर बसवून कोल्हापुरात वृक्षहत्या; सुराज्य अभियानाची फौजदारी कारवाईची मागणी५०० हून अधिक भाताचे प्रकार बनवून कोल्हापुरात नवा जागतिक विक्रम रचणार; मास्टर शेफ दिग्विजय भोसलेंची घोषणाकृषी पणन मंडळामार्फत शहरात मिलेट व फळ महोत्सवास प्रारंभशिवाजी विद्यापीठात २४ एप्रिलला शाश्वत शेती परिषदमुंबईत घुमणार युवाशक्तीचा आवाज; कृष्णराज महाडिक यांच्या संकल्पनेतून ध्येय-धोरणांचा जागर!

जाहिरात

 

पुस्तक : मानवी भावना, ज्ञान आणि संस्कृतीच्या संवादाचे प्रभावी माध्यम

schedule23 Apr 26 person by visibility 83 categoryसामाजिक

'पुस्तक हा माणसाचा सर्वात जवळचा आणि प्रामाणिक मित्र असतो', हे वचन आपण पिढ्यानपिढ्या ऐकत आलो आहोत. मात्र, आजच्या धावपळीच्या युगात या वचनाची प्रचिती पुन्हा एकदा घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आज, २३ एप्रिल रोजी जगभर साजरा होणारा 'जागतिक पुस्तक दिन' ही आपल्यासाठी केवळ एक तारीख नसून, पुस्तकांच्या माध्यमातून स्वतःला शोधण्याची आणि समृद्ध करण्याची एक मोठी संधी आहे. युनेस्कोने १९९५ मध्ये २३ एप्रिल हा दिवस 'जागतिक पुस्तक दिन' म्हणून घोषित केला. या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, कारण याच दिवशी विल्यम शेक्सपिअर आणि मिगेल दे सर्व्हांतेस यांसारख्या जगप्रसिद्ध साहित्यिकांचा जन्म किंवा स्मृती जोडलेली आहे. जगभरात वाचन संस्कृती वाढवणे आणि ज्या लेखकांनी आपल्या लेखणीने समाजाला दिशा दिली, त्यांचा यथोचित सन्मान करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

कोल्हापूरची माती ही केवळ कुस्ती आणि पराक्रमाची नाही, तर ती विचारांच्या आणि साहित्याच्या पेरणीचीही आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीने या भूमीत शिक्षणाची आणि ग्रंथालयांची द्वारे खुली झाली आणि याच भूमीने मराठी साहित्याला वि. स. खांडेकर यांच्या रूपाने पहिले 'ज्ञानपीठ' मिळवून दिले. रणजित देसाईंच्या 'स्वामी' आणि 'श्रीमान योगी' या कादंबऱ्यांनी आजही वाचकांच्या मनात आपले घर कायम ठेवले आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा वैचारिक वारसा इथल्या ग्रंथालयांत जतन केलेला असून, जिल्ह्यात शासनमान्य ६०० हून अधिक सार्वजनिक ग्रंथालयांमधून सुमारे ४४ लाख ७२ हजार इतकी अफाट पुस्तक संख्या उपलब्ध आहे. यात अ वर्ग १९, ब वर्ग ९३, क वर्ग ३२५ आणि ड वर्गातील १५० हून अधिक ग्रंथालयांचा समावेश आहे. करवीर नगर वाचन मंदिर यांसारख्या संस्थांनी शंभर वर्षांहून अधिक काळ पुस्तकांचे जतन करून कोल्हापूरची वाचन संस्कृती जिवंत ठेवली आहे. कोल्हापूरचा वाचक हा नेहमीच दर्जेदार साहित्याचा चाहता राहिला असून, येथील ग्रंथालये आणि वाचन चळवळ ही जिल्ह्याच्या वैचारिक विकासाचा कणा आहे.

पुस्तके म्हणजे केवळ कागदांचा संग्रह नसून ती अनुभवांची खाण आहे. एका पुस्तकाच्या वाचनाने आपल्याला लेखकाच्या आयुष्यभराचे चिंतन आणि अनुभव अवघ्या काही तासांत प्राप्त होतात. वाचनामुळे विचारशक्ती प्रगल्भ होते, भाषेवर प्रभुत्व मिळते आणि मानवी संवेदना अधिक जागृत होतात. आज माहिती मिळवण्याची अनेक डिजिटल साधने उपलब्ध असली तरी, प्रत्यक्ष पुस्तक हातात धरून वाचण्याचा आनंद हा अवर्णनीयच आहे. पुस्तकाचा तो विशिष्ट सुवास, पानांचा स्पर्श आणि सावकाशपणे उलटली जाणारी पाने वाचनाचा एक वेगळाच तृप्त अनुभव देतात. पुस्तकातील मजकूर जेव्हा आपण वाचतो, तेव्हा आपली कल्पनाशक्ती अधिक वेगाने कार्य करू लागते; म्हणूनच घरातील कपाटात सजलेली पुस्तके ही त्या घराच्या सुसंस्कृतपणाचे दर्शन घडवत असतात.
हा दिवस साजरा करत असताना आपण सर्वांनी काही छोटे पण महत्त्वाचे संकल्प करणे गरजेचे आहे. आपण स्वतः किमान एक पुस्तक वाचूया, मुलांना भेट म्हणून पुस्तके देऊया, सार्वजनिक ग्रंथालयांचे सदस्य होऊया आणि वाचलेल्या पुस्तकातील विचारांवर आपल्या मित्र-मैत्रिणींशी किंवा कुटुंबाशी चर्चा करूया, जेणेकरून ते विचार समाजात अधिक प्रवाही होतील. प्रशासकीय कामकाजात आणि सार्वजनिक जीवनात संवादाची भाषा ही साहित्यातूनच परिपक्व होत असते. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. ग्रंथ प्रदर्शने आणि शालेय स्तरावरील वाचन स्पर्धांच्या माध्यमातून पुस्तके सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा जिल्हा ग्रंथालय कार्यालयाचा मानस आहे. पुस्तके ही जगातील सर्वात शांत आणि विश्वासार्ह मार्गदर्शक आहेत, जी आपल्याला कधीच एकटे पाडत नाहीत. आपली ही गौरवशाली वाचन परंपरा अधिक समृद्ध करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया आणि आजच्या जागतिक पुस्तक दिनी आपल्या आयुष्यात पुस्तकांना पुन्हा एकदा सर्वोच्च स्थान देऊया.

✍️ सचिन अडसूळ, 
जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes