संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये आयटीआय जॉब फेअर ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४५० विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड
schedule23 Apr 26 person by visibility 96 categoryराजकीय
कोल्हापूर : अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित आयटीआय जॉब फेअरला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून तब्बल ४५० विद्यार्थ्यांची नामांकित औद्योगिक कंपन्यांमध्ये निवड झाल्याने पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या जॉब फेअरचे आयोजन इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. पुणे येथील टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल आणि केआयएम एल या कोरियन बहुराष्ट्रीय कंपनीने या उपक्रमात सहभाग घेतला होता. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील आयटीआय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले.
कंपनीच्या तज्ज्ञ प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांची तांत्रिक (टेक्निकल) तसेच एचआर मुलाखत घेऊन पात्र उमेदवारांची निवड केली. निवड झालेल्या ४५० विद्यार्थ्यांना तत्काळ नियुक्तीपत्र देण्यात आले, ही या जॉब फेअरची विशेष बाब ठरली.
या निवड प्रक्रियेसाठी टाटा मोटर्सचे प्रतिनिधी ओम काकड, प्रताप गायकवाड तसेच केआयएम एल कंपनीचे सुहास भावरी, महादेव माने आणि सुशील सावंत उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख आशिष पाटील आणि आयटीआय विभागाचे अविनाश पाटील यांनी आपल्या टीमसह विशेष परिश्रम घेतले. तसेच विभागप्रमुख नितीन पाटील, रईसा मुल्ला आणि प्रशांत पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
विद्यार्थ्यांना उद्योगजगताशी थेट जोडून देणारा हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला असून त्यांच्या करिअरला नवी दिशा देणारा ठरला आहे. संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत आणि विश्वस्त विनायक भोसले यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सुजित मोहिते यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रथमेश गोंधळी यांनी केले.