कोल्हापूर : "राष्ट्र उभारणीमध्ये शिक्षकांचे योगदान अत्यंत मूलभूत असून नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शिक्षकाने नवीन कौशल्ये आत्मसात करायला हवीत. त्यातूनच एक सुजाण विद्यार्थी आणि नागरिक घडेल. शिक्षकांनी सुद्धा नेहमी एक विद्यार्थी असणे हे एक उपयुक्त तंत्र आहे" असे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी केले.
डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये 'राष्ट्रीय शिक्षक दिना'च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शिक्षणप्रक्रियेत वैशिष्ट्यपूर्ण योगदान देणाऱ्या शिक्षकांचा सन्मान यावेळी प्राचार्य साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी शिक्षकांना शुभेच्छा देऊन कृतज्ञता व्यक्त केली. भावपूर्ण वातावरणातील विद्यार्थी शिक्षकांच्या घनिष्ठ संवादाने परिसर उत्साहपूर्ण बनला.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य साळुंखे यांनी शिक्षकांचा आचार- विचार, चारित्र्य, भविष्याचा वेध घेण्याची क्षमता, विविधांगी दृष्टिकोन, समर्पण भावना इत्यादी विविध विषयांना स्पर्श केला. शिक्षक समूहाने यावेळी शिक्षण प्रक्रियेतील विविध विषयांवर आपली मते विस्ताराने मांडली.
याप्रसंगी बोलताना संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्रा. विरेन भिर्डी यांनी " पारंपारिक शिक्षक ही कल्पना आता उपयोगाची नसून मल्टीटास्किंग शिक्षक हीच काळाची गरज आहे. ' स्ट्राँग स्किलसेट 'असणारा सक्षम शिक्षक विद्यार्थ्यांसाठी आदर्श असतो", असे प्रतिपादन केले. इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांनी शिक्षण प्रवाहामध्ये होत असलेले नवीन बदल, त्यामध्ये शिक्षकांच्या जबाबदाऱ्या आणि भूमिका, विद्यार्थीकेंद्रित शिक्षणविचार याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिवा प्रा. शुभांगी गावडे , संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सहकार क्षेत्रातील श्री. कुपेकर- देसाई, सर्व विभागप्रमुख, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. सुदर्शन महाडिक यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. जमीर मुल्लानी यांनी आभार मानले.