कोल्हापूर : शिंगणापूर (ता. करवीर) ग्रामपंचायतीने नवीन मतदार नोंदणी करतेवेळी अल्पसंख्याक (मुस्लीम) यांची नोंदणी करू नये, असा ठराव केल्याचे पत्र व्हायरल झाल्यानंतर संभ्रम निर्माण झाला होता; पण ही चूक लक्षात आल्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने मुस्लीम नव्हे, तर बांगलादेश नागरिकांची नोंदणी करू नये, असे स्पष्टीकरण देण्यात आले. याप्रकरणी करवीरच्या गटविकास अधिकाऱ्यांनी लेखी खुलासा मागितला आहे.
मे महिन्यात नागदेववाडी (ता. करवीर) येथील एका कॉलनीत बनावट आधारकार्ड बनवून राहत असलेल्या बांगलादेशी महिलांना पोलिसांनी अटक केली होती. यावर, २८ ऑगस्टला झालेल्या शिंगणापूर गावसभेत चर्चा होऊन सतर्कता बाळगण्याची सूचना ग्रामस्थांनी दिली होती. हा ठराव करताना बांगलादेशी असे म्हणण्याऐवजी अल्पसंख्याक मुस्लीम असा शब्द वापरला होता.
▪️सरपंचासह सदस्यांवर गुन्हा दाखल करा : मुस्लीम बोर्डिंग
कोल्हापूर : शिंगणापूर (ता. करवीर) ग्रामपंचायतीने मुस्लीम मतदार नोंदणी न करण्याबाबत केलेला ठराव हा घटनाबाह्य असून धार्मिक तेढ निर्माण करणारा आहे. संबंधित सरपंच, सदस्य व ग्रामसेवकांवर गुन्ह दाखल करा, अशी मागणी मुस्लीम बोर्डिंगच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे रविवारी करण्यात आली.
हा ठराव म्हणजे मुस्लीम समाजावर बहिष्कार टाकण्याचा प्रकार आहे. धर्माच्या आधारावर मतदानाचा अधिकार काढू घेणे योग्य नाही. याबद्दल सरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मुस्लीम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर व प्रशासक कादर मलबारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
▪️ग्रामपंचायतीने मागितली माफी
समाजात विषमता निर्माण करणारा किंवा तसा हेतू असणारा कोणत्याही प्रकारचा ठराव आम्ही करणार नाही. याबद्दल त्या पत्रात उल्लेख केलेल्या मुस्लीम अल्पसंख्याक समुदायाची आम्ही माफी मागतो, असे पत्रक सरपंच रसिका पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे.