कोल्हापूर : महिलांसाठी अनेक कायदे आहेत, या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पीडित महिलेने कोणालाही न घाबरता पुढे येऊन तक्रार दिली पाहिजे, असे मत भारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेजच्या माजी प्राचार्या डॉ. मंगला पाटील यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या जर्नालिझम अॅन्ड मास कम्युनिकेशन विभागात शिक्षक दिनानिमित्त ‘महिलांविरोधातील हिंसाचार आणि कायदे’ या विषयावर त्या बोलत होत्या. स्वागत आणि प्रस्ताविक विभागप्रमुख प्रा. डॉ. निशा पवार यांनी केले.
डॉ. मंगला पाटील म्हणाल्या, अत्याचारग्रस्त महिला किंवा मुलीने तक्रार देण्यास पुढे येण्यासाठी समाजात चांगले वातावरण हवे. समाजाने पीडितेेच्या मागे उभे राहायला हवे. पीडितांना समर्थन मिळाल्यास ती नक्कीच तक्रार करायला पुढे येईल. महिलांसाठी अनेक कठोर कायदे आहेत. परंतु तक्रारीअभावी महिलांच्या विरोधात अत्याचार होत असूनही दोषी मोकाट राहतात. पोलिस तपासातही कमी राहता कामा नये. महिलांवर अत्याचार केल्यानंतर जबरी शिक्षा होते असा संदेश जायला हवा. यासाठी जलदगतीने न्याय प्रक्रिया राबववी, असेही डॉ. सौ. पाटील यांनी नमूद केले.
दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर महिला अत्याचाराच्या विरोधात कठोर कायदे आले. मुलांवरील अत्याचारासंदर्भात अलिकडे आलेला पोक्सो कायदाही महत्त्वाचा आहे. नुसते कठोर कायदे करुन चालत नाही तर त्याच्या अंमलबजावणीसाठी तसे समाजभानही असायला हवे. कायद्यांचे शिक्षण आणि जनजागृतीतून समाजात बदल घडवणे शक्य आहे.
या बदलाची सुरुवात कुटुंबापासून व्हावी. आई-वडिलांनी मुलांना वेळ देऊन त्यांच्याशी संवाद साधला तर समाज बदलाला पूरक वातावरण तयार होईल, असेही डॉ. पाटील म्हणाल्या. आभार डॉ. शिवाजी जाधव यांनी मानले. यावेळी जयप्रकाश पाटील आणि डॉ. सुमेधा साळुंखे उपस्थित होते.