'आप' इंडिया आघाडीतून बाहेर, कोल्हापूर महापालिका निवडणुकीत स्वतंत्र लढणार
schedule23 Dec 25 person by visibility 66 categoryराजकीय
कोल्हापूर : शहरातील ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठवून आप ने रस्त्यावरची लढाई लढणारा पक्ष अशी ओळख निर्माण केली आहे. प्रत्यक्ष मैदानात उतरलेलेल्या आप ने आता सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
एका बाजूला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे असं म्हणायचं, तर दुसऱ्या बाजूला घराणेशाहीला खतपाणी घालत धनाढ्य उमेदवारांना प्राधान्य द्यायचं असं दुटप्पी धोरण प्रस्थापित पक्षांनी राबवलं आहे.
गेले दोन आठवडे महाविकास आघाडीसोबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरु होते. आप ने सुरुवातीला दहा जागांचा प्रस्ताव दिला होता. त्यातील सात जागंवर चर्चा करण्याची तयारी काँग्रेसच्या समितीने दाखवली होती. परंतु एक आणि दोन जागांवर आम्ही तुमचा विचार करू असा निरोप आल्याने आप ने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का अशी भावना तीव्र असताना आप ने मात्र कार्यकर्त्यांना संधी दिली आहे.
लोकसभा, विधानसभेला आम्ही आघाडीचे काम प्रामाणिकपणे केले. महापालिका निवडणुकीमध्ये इंडिया आघाडी म्हणून लढूया असा प्रस्ताव खुद्द काँग्रेसने दिला होता. परंतु मित्रपक्षांना फक्त गरजेपुरते वापरा आणि परतफेड करायची वेळ आली कि, निवडणुकीच्या निकषांमध्ये तुम्ही बसत नाही असे म्हणत फेकून द्यायचे असे धोरण काँग्रेस वापरत असल्याची घणाघाती टीका आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केली.
आम आदमी पार्टी महापालिकेच्या सर्व जागा लढवणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. प्रामाणिक काम करणारे विविध पक्षातील इच्छुक कार्यकर्ते, डॉक्टर इंजिनियर यासारखे कोल्हापूरचे भविष्य घडवण्याची मानसिकता ठेवणारे सुशिक्षित नागरिक तसेच सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या महिलांनी पक्षाला संपर्क करावा, आम्ही त्यांना उमेदवारी देऊ असे आवाहन करण्यात आले. त्याच बरोबर विकासाचा अजेंडा घेऊन पुढे येणाऱ्या समविचारी पक्षांशी देखील युती होण्याची शक्यता यावेळी संदीप देसाई यांनी व्यक्त केली.
यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, महासचिव अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, दुष्यंत माने, उषा वडर, विजय हेगडे, प्रसाद सुतार, अनिल जाधव आदी उपस्थित होते.





