कोल्हापुरात 'पुनर्चक्रीकरणाची भिंत' उपक्रम; कचरामुक्त शहरासाठी 'अवनी'चा पुढाकार
schedule02 Apr 26 person by visibility 229 categoryसामाजिक
कोल्हापूर : पर्यावरण संवर्धन आणि कचरा व्यवस्थापनाच्या उद्देशाने कोल्हापुरात 'पुनर्चक्रीकरणाची भिंत' हा अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे. अवनी संस्था, एकटी संस्था, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स, कोल्हापूर महानगरपालिका आणि कचरा वेचक महिला यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प साकारला जात आहे. या स्तुत्य उपक्रमाचा शुभारंभ सोमवार, ७ एप्रिल रोजी सकाळी १०:३० वाजता दसरा चौक येथे कोल्हापूरच्या महापौर यांच्या हस्ते होणार आहे.
शहरात वाढत चाललेली कचऱ्याची समस्या आणि रस्त्याकडेला साचणारे ढीग यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून 'कचरा ही संपत्ती आहे' हा संदेश जनमानसांत रुजवण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे.
या उपक्रमांतर्गत नागरिकांच्या घरातील वापरात नसलेल्या जुन्या वस्तू जसे की जुने कपडे, पुस्तके, रद्दी, खेळणी, फर्निचर, प्लास्टिक साहित्य, भांडी आणि ई-वेस्ट स्वीकारले जाणार आहेत. या गोळा केलेल्या वस्तूंवर प्रक्रिया करून त्यातून नवीन वस्तू तयार केल्या जातील आणि त्याचे प्रदर्शन ५ जून रोजी 'जागतिक पर्यावरण दिना'निमित्त आयोजित केले जाईल.
यामुळे कचरावेचकांना सन्मानाचा रोजगार मिळेल आणि शहर सुशोभीकरणास मदत होईल. नागरिकांच्या सोयीसाठी दसरा चौक, सासाणे ग्राउंड, शाहू नाका, राजारामपुरी (जनता बाजार) आणि संभाजीनगर येथील निर्माण चौक येथे ठराविक वेळी वस्तू संकलनासाठी केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी कोल्हापूरकरांनी या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक संजय पाटील, शरद आजगेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.