आषाढी यात्रेसाठी एस.टी. महामंडळाची मोठी घोषणा: ५,५०० विशेष बसेस धावणार!
schedule12 Jul 26 person by visibility 137 categoryराज्य
मुंबई : आषाढी यात्रेसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा, यासाठी राज्य परिवहन महामंडळाने विशेष तयारी केली आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या आषाढी यात्रेसाठी ५ हजार ५०० विशेष बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, जर ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी (ग्रुप बुकिंग) केल्यास, त्यांच्या गावापासून थेट पंढरपूरपर्यंत बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या विशेष बस सेवेत शासनाच्या सर्व प्रवासी सवलती लागू राहणार आहेत; यात ७५ वर्षांवरील ज्येष्ठांसाठी 'अमृत ज्येष्ठ नागरिक' योजनेंतर्गत मोफत प्रवास आणि महिलांसाठी ५० टक्के तिकीट सवलत दिली जाणार आहे.
भाविकांच्या सोयीसाठी पंढरपूर आणि परिसरात चंद्रभागा, भीमा (देगाव), विठ्ठल कारखाना आणि पांडुरंग अशी चार तात्पुरती बसस्थानके उभारली जाणार असून, तिथे पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि इतर मूलभूत सुविधांची व्यवस्था असेल. यात्रेच्या काळात रात्रंदिवस सेवा देणाऱ्या १३ हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चातून केली आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ३६ हून अधिक वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षक तैनात केले जाणार असून, भाविकांनी जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.