‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या संख्येने विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे : निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव
schedule07 Feb 26 person by visibility 79 categoryराज्य
कोल्हापूर : अल्पसंख्यांक विकास विभाग, महाराष्ट्र शासन आणि राज्यस्तरीय समागम समिती यांच्या वतीने ‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचे कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येत आहेत. नागपूर येथे ७ डिसेंबर २०२५ रोजी तसेच नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी शहीदी समागमाचे कार्यक्रम पार पडले. यानंतर नवी मुंबई येथे दिनांक २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी देशाचे पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्ह्यातूनही असंख्य लोक उपस्थित राहणार आहेत.
या अनुषंगाने येणाऱ्या कालावधीत शिक्षण, आरोग्य विभाग तसेच इतर शासकीय कार्यालयांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून मोठ्या संख्येने विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या.
तत्पूर्वी दूरदृश्य प्रणालीद्वारे नवी मुंबई येथील कार्यक्रमस्थळावरील सुरक्षा, पाणीपुरवठा, भोजन, निवास, वाहतूक, स्वच्छता आदी बाबींच्या व्यवस्थेबाबत मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांनी निर्देश दिले. नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शालेय स्तरावर प्रभातफेरी, विविध स्पर्धा, आरोग्य शिबिरे, शासकीय कार्यालयांमध्ये माहितीपर बॅनर, श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनावर आधारित गाण्यांचे प्रसारण तसेच माहितीपटांचे प्रदर्शन आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र शासनाने सर्व समाजघटकांना सोबत घेऊन एक राज्यस्तरीय समिती गठित केली आहे. या समितीत शीख बांधवांसह सिकलकर, बंजारा, लबाना, मोहयाल, वाल्मिकी, उदासीन आणि भगत नामदेव वारकरी संप्रदाय अशा विविध समुदायांचा समावेश करण्यात आला आहे. यामधून शासनाने गुरु साहिबांच्या ‘मानवता’ या संदेशाला खऱ्या अर्थाने अधोरेखित केले आहे.
‘हिंद-दी-चादर’ म्हणून जगभरात ओळखल्या जाणाऱ्या या महान संतांनी केवळ धर्मासाठीच नव्हे, तर मानवी मूल्ये, धर्मस्वातंत्र्य आणि स्वाभिमानासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या या अजोड बलिदानाला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या ऐतिहासिक औचित्यावर महाराष्ट्र शासनाने या महापुरुषाचे स्मरण करण्यासाठी तसेच त्यांच्या त्यागाचा वारसा आधुनिक काळातील तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी एक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक सेतू उभा केला आहे.