'आप' स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ताकदीने उतरणार : संदीप देसाई
schedule14 Jul 25 person by visibility 211 category

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची वाट मोकळी झाली आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. येणाऱ्या कोल्हापूर, इचलकरंजी महापालिका तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत निवडणुकीत ताकदीने उतरणार असल्याची घोषणा आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी पत्रकार बैठकीत केली.
▪️नव्या नेतृत्वाला संधी : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्याच त्याच चेहऱ्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. एकीकडे भौतिक सोईसुविधांची वानवा होत असताना, हे प्रस्थापित कारभारी मात्र गब्बर होत आहेत. त्यामुळे याठिकाणी नवीन चेहरे येणे गरजेचे आहेत. सामाजिक प्रश्नांची जाण असणारे, उच्चशिक्षित नव्या नेतृत्वाला संधी देऊन बदल घडवण्यासाठी या निवडणुका असणार आहेत.
▪️लोकांच्या देणगीतून निवडणूक : या निवडणुका काहींसाठी व्यवसाय झाला आहे. निवडून येण्यासाठी पैसे लावायचे आणि निवडून आल्यावर ते काढून घेण्यासाठी प्रयत्न करायचे. ही पद्धत मोडीत काढण्यासाठी आम आदमी पार्टी जनतेतून देणग्या घेऊन निवडणूक लढवणार आहे.
▪️लक्षवेधी आंदोलनांमुळे चर्चेत : जिल्हा तसेच शहरातील अनेक मूलभूत प्रश्नांवर आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून प्रशासनाला जाब विचारणारा पक्ष म्हणून आप ने आपली ओळख बनवली आहे. कोल्हापूर शहरातील रस्ते, पाणी, कचरा उठाव, स्वच्छतागृहे, जलतरण तलाव या सारख्या ज्वलंत प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे. त्यामुळे शहरातील मतदारांसाठी आप आगामी निवडणुकांसाठी पर्याय बनून प्रस्थापितांसाठी आवाहन बनू शकतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
▪️इचलकरंजीची पहिली महापालिका निवडणुक असल्याने या निवडणुकीत शहराच्या शाश्वत विकासाचे धोरण घेऊन ही निवडणूक लढवली जाणार आहे.
▪️बदलात सामील होण्याचे आवाहन : कोल्हापूरला हवा बदल नवा या मोहिमेखाली स्वयंसेवक तथा कार्यकर्ता नोंदणी अभियानाची सुरुवात आप ने केली. या नोंदणी अभियानाद्वारे जिल्ह्यातील दहा हजार लोकांना पक्षासोबत जोडण्याचे लक्ष असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बदलात सामील होण्यासाठी 8180867761 या नंबरवर मिस्ड कॉल द्या अथवा joinaapkop.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी असे आवाहन आप च्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी आपचे जिल्हाध्यक्ष अरुण गळतगे, उत्तम पाटील, वसंत कोरवी, किरण साळोखे, अभिजित कांबळे, समीर लतीफ, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, दुष्यंत माने, विजय हेगडे, अनिल जाधव, राकेश गायकवाड, ऍड. सी व्ही पाटील, संजय नलवडे, उषा वडर, आदम शेख, स्वप्नील काळे, महंमदशरीफ काझी, उमेश वडर, रमेश कोळी, सफवान काझी आदी उपस्थित होते.