काळम्मावाडी धरणातील पाणीपातळी घटल्याने नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा : महापालिकेचे आवाहन
schedule11 Jun 26 person by visibility 133 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : अलनिनोच्या प्रभावामुळे यावर्षी मान्सून लांबल्याने काळम्मावाडी धरणातील पाणीपातळी कमी झाली असून, काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईन योजनेद्वारे होणारा पाणी उपसा सध्या बंद झाला आहे. परिणामी, या योजनेतून शहराला पाणीपुरवठा होणार नाही.
शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महानगरपालिकेकडून शिंगणापूर, बालिंगा व नागदेववाडी पंपिंग स्टेशनमधून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. आगामी काळातील पावसाची शक्यता तसेच नदीतील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन या पंपिंग स्टेशनच्या क्षमतेनुसार पाण्याचा उपसा करण्यात येणार आहे.
पावसाळा पूर्णतः सुरू होईपर्यंत उपलब्ध पाणीसाठा पुरविण्याच्या दृष्टीने पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करावा व महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.