पेपर लीक प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी!
schedule22 Jul 26 person by visibility 134 categoryदेश
नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशातील शिक्षण व्यवस्था आणि पेपर लीकच्या मुद्यावरून केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. गेल्या १० वर्षांत तब्बल १५२ वेळा पेपर लीक झाल्याचे नमूद करत, यामुळे ७ कोटींहून अधिक कुटुंबांचे भविष्य उद्ध्वस्त झाल्याचा गंभीर दावा त्यांनी केला आहे.
दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले की, शांतिपूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सुरक्षा बलांकडून लाठीचार्ज आणि मारहाण करण्यात आली. व्यवस्था आणि यंत्रणेविरुद्ध आज देशातील तरुणांमध्ये तीव्र रोष उसळला आहे. केवळ NEET परीक्षेवर देशातील विद्यार्थी तब्बल १.३२ लाख कोटी रुपये खर्च करत आहेत, जो भारताच्या एकूण वार्षिक शिक्षण ĺबजेटच्या जवळपास एवढाच आहे. मात्र, या १५२ पेपर लीक प्रकरणांपैकी एकाही दोषी व्यक्तीला अद्याप शिक्षा झालेली नाही, असे सांगत त्यांनी सरकार विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत पूर्णपणे असंवेदनशील असल्याचे म्हटले.
◼️राहुल गांधींच्या ३ प्रमुख मागण्या:
* केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा.
* आंदोलक विद्यार्थ्यांवर बर्बरता करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी.
* देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्येशी खेळल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी.
तसेच, देशात अशी व्यवस्था निर्माण झाली आहे की, ज्यांच्याकडे ४० लाख रुपये आहेत, तेच आज पैशांच्या बळावर सरकारी नोकरी विकत घेऊ शकतात, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.