सैनिक टाकळीत एमआयडीसी झालीच पाहिजे; सर्वपक्षीय पदाधिकारी, माजी सैनिक व ग्रामस्थांचा एल्गार
schedule08 Aug 26 person by visibility 101 categoryराज्य
◼️रोजगार, विकास आणि ग्रीन इंडस्ट्रीसाठी एकमुखी समर्थन; विरोधासाठी विरोध न करण्याचे आवाहन
सैनिक टाकळी : सैनिक टाकळी येथे प्रस्तावित एमआयडीसीच्या समर्थनार्थ गावातील माजी सैनिक, सर्वपक्षीय पदाधिकारी, शेतकरी, युवक व ग्रामस्थांनी एकत्र येत 'सैनिक टाकळीत एमआयडीसी झालीच पाहिजे' अशी ठाम भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडली. या परिसरातील बेरोजगार युवकांच्या हाताला रोजगार मिळावा, स्थानिक महिलांना उद्योगांमध्ये कामाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि दक्षिण शिरोळ तालुक्याच्या विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने एमआयडीसीची उभारणी अत्यंत आवश्यक असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या प्रयत्नातून सैनिक टाकळी येथे एमआयडीसीला मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पामुळे परिसरात उद्योगधंदे उभे राहून स्थानिक युवकांना रोजगार मिळेल, तसेच गावाच्या आर्थिक विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. काहींकडून शेतीची जमीन जाईल, प्रदूषण वाढेल अशा कारणांवरून विरोध केला जात असला, तरी हा प्रकल्प ग्रीन झोन एमआयडीसी स्वरूपाचा असून येथे प्रदूषणमुक्त उद्योगच उभारले जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
सुमारे ४०० एकर क्षेत्रापैकी ५० एकर जागा सैनिकी शाळा, युवकांसाठी क्रीडांगण, भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र तसेच विविध विकासकामांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. याशिवाय गारमेंट क्लस्टरसह विविध प्रदूषणविरहित उद्योग येथे येणार असल्याने शेकडो युवक व महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. उद्योगांमध्ये स्थानिकांना प्राधान्य दिले जाणार असून माजी सैनिकांसाठी सैनिकी कॅन्टीन उभारण्यासाठीही आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर प्रयत्न करणार असल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी माजी उपसभापती हरिश्चंद्र पाटील म्हणाले, एमआयडीसीमुळे गावाचा सर्वांगीण विकास होणार आहे. रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार असल्याने विरोधासाठी विरोध न करता गावाच्या हिताचा विचार करावा.
माजी सैनिक विजय पाटील यांनी सांगितले की, शिरोळ तालुक्याचा दक्षिण भाग आजपर्यंत मोठ्या उद्योगांपासून वंचित राहिला आहे. गुरुदत्त शुगर्स वगळता मोठा उद्योग येथे आलेला नाही. एमआयडीसीमुळे युवकांना ४०-४० किलोमीटर दूर नोकरीसाठी जावे लागणार नाही. स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाल्याने नोकरीसोबत शेती व पशुपालनही करता येईल.
माजी सैनिक कोंडाजी पवार म्हणाले, कागल आणि गोकुळ शिरगावसारख्या गावांचा विकास एमआयडीसीमुळे झाला. मग सैनिक टाकळीचा विकास का होऊ नये? महिलांना रोजगार मिळाल्यास त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. गावाच्या भविष्यासाठी एमआयडीसी अत्यावश्यक आहे.
यावेळी बोलताना माजी उपसरपंच रणजितसिंह पाटील म्हणाले, सदर एमआयडीसीमध्ये महिलांसाठी गारमेंट क्लस्टर होणार असल्याने हवा, पाणी प्रदुषणाचा प्रश्नच उद्भवणार आणि गुन्हेगाराचे प्रमाण देखील वाढणार नाही. सध्या शिरोळ तालुक्यात शाहू इंडस्ट्रीज, पार्वती इंडस्ट्रीज, लक्ष्मी इंडस्ट्रीज, ल.क. अकिवाटे इंडस्ट्रीज या पाच इंडस्ट्रीमध्ये कोणतेही गुन्हेगारीचे प्रमाण नाही त्यामुळे सैनिक टाकळीच्या विकासाकरिता एमआयडीसी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी सरपंच उमेश पाटील, संभाजी गोते, सुधीर पाटील, इंजि. उमेश पाटील, अविनाश मगदूम, संजय पाटील, अशोक गायकवाड, संताजी पाटील, दीपक इंगळे, नितीन पाटील, मिलिंद पाटील, अभिजीत पाटील, माजी सैनिक दत्तात्रय शिंदे, अण्णासाहेब पाटील, माजी सैनिक अमर पाटील, शंकर पाटील, मंगेश पाटील, सचिन पाटील, विजय खोत, संभाजी पाटील, संजय राजाराम पाटील,
सुधाकर इंगळे, निखिल पाटील, अरुण पाटील, विजय सावंत, संदीप पवार, सागर बिरणगे, सुशिल कांबळे, संभाजी गायकवाड, दत्ता जगदाळे, सुभाष पाटील, युवराज पाटील, सुनिल पाटील, अजित पाटील यांच्यासह माजी सैनिक, सर्वपक्षीय पदाधिकारी, शेतकरी, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.