कोल्हापुरात २२ किलो गांजासह तिघांना अटक; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
schedule19 Jun 26 person by visibility 161 categoryगुन्हे
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या नशामुक्त अभियानांतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत उजळाईवाडी (ता. करवीर) येथून २२ किलो गांजासह तीन इसमांना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, उजळाईवाडी तलावाजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत राजकिरण जयवंत मोरे (वय २६), संतोष दिनकर माने (वय ४७) आणि सोमनाथ रघुनाथ मंडले (वय ३६, सर्व रा. ता. पाटण, जि. सातारा) या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून ५ लाख ५० हजार रुपये किमतीचा २२ किलो गांजा, एक कार, एक स्पोर्ट्स बाईक आणि तीन मोबाईल हँडसेट असा एकूण १२ लाख १७ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी गोकुळ शिरगांव पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.