राजेंद्रनगर घरफोडीचा गुन्हा उघड; १०२ ग्रॅम सोने व १६ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त
schedule20 Aug 26 person by visibility 147 categoryगुन्हे
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील राजेंद्रनगर येथील 'साची रेजिडेन्सी' मधील बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून डल्ला मारणाऱ्या घरफोडीच्या गुन्हा (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा) कोल्हापूरने यशस्वीरीत्या उघडकीस आणला आहे. या कारवाईत १०१.८६० ग्रॅम सोन्याची लगड, मोबाईल फोन, लोखंडी पकड, मुस आणि मोटारसायकल असा एकूण १६,०८,९००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्याच्या समांतर तपासासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व तपास पथक तयार केले होते.
गोपनीय माहितीच्या आधारे तपास पथकाने दिनांक १९ ऑगस्ट २०२६ रोजी अंकली पुल, जयसिंगपूर येथे सापळा रचून गणेश अरुण चव्हाण (वय ३१, रा. बेडग, ता. मिरज, जि. सांगली) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची व चोरी केलेले दागिने विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह त्यास पुढील तपासासाठी राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, संतोष गळवे, रुपेश इंगळे आणि पथकातील इतर अंमलदारांनी केली आहे.