कैलास गडची स्वारी मंदिर विकासाच्या वाटचालीतील आधारस्तंभ हरपला
schedule25 Jun 25 person by visibility 386 categoryसामाजिक

कोल्हापूर : मंगळवार पेठ, कोल्हापूर येथील प्रसिद्ध कैलास गडची स्वारी मंदिराचे अध्यक्ष बबेराव शंकरराव जाधव (वय ९५) यांचे निधन झाले आणि कैलास गडची स्वारी मंदिराच्या विकासाच्या वाटचालीतील आधारस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. माजी आमदार व शिवसेनेच्या उपनेत्या जयश्री चंद्रकांत जाधव यांचे ते सासरे होत. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक विवाहित मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरूवार दि. २६ जून २०२५ रोजी सकाळी ९.०० वा. पंचगंगा स्मशानभूमी कोल्हापूर येथे आहे.
बबेराव जाधव हे शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावान व जुने कार्यकर्ते होते. ते केवळ राजकीयच नव्हे तर धार्मिक व सामाजिक क्षेत्रातही सक्रिय योगदान देणारे व्यक्तिमत्व आहे. कोल्हापूरचे माजी नगराध्यक्ष एम. के. जाधव यांच्या पश्चात कैलास गडची स्वारी मंदिराच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे स्वीकारली आणि नवनिर्माणाच्या दिशेने मंदिराच्या विकासाची वाटचाल भक्कम केली. त्यांच्या कार्यकाळात मंदिराच्या जडणघडणीचे सोनेरी पर्व पाहायला मिळाले.
स्थापत्यविषयक कामांपासून ते भाविकांच्या सोयीसुविधांपर्यंत अनेक उपक्रम राबवले गेले. मंदिराच्या वर्धापन दिनी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहत असून, महाप्रसादाची ख्याती गावोगावी पोहोचलेली आहे. त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वरी पारायण, गणेशोत्सव, शिवजयंती व शिवपुण्यतिथी यासारखे कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने आणि शिस्तबद्धतेने पार पडत. प्रत्येक कार्यक्रम भाविकांना अध्यात्मिक उन्नतीचा अनुभव देणारा ठरत होता. त्यांच्या सुसंस्कृत नेतृत्वामुळे मंदिर केवळ उपासनेसाठीचे केंद्र न राहता, संघटन, श्रद्धा आणि समाजाभिमुखतेचे प्रतीक ठरले आहे.