लोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या जयजयकाराने दुमदुमले कोल्हापूर
schedule26 Jun 25 person by visibility 170 categoryराज्य

▪️लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा
कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय ! या जयघोषाने शाहू महाराजांचे स्मरण करुन देणाऱ्या शोभा यात्रा व समता दिंडीला कोल्हापूरकरांनी भरघोस प्रतिसाद दिला. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्ताने जिल्हा प्रशासन व सहायक आयुक्त समाजकल्याण विभागाच्या वतीने दसरा चौकात समता दिंडीसह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
समता दिंडीचे उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करुन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी.टी शिर्के, महापालिका आयुक्त के.मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी तथा संशोधन अधिकारी संभाजी पोवार, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीच्या सहायक संचालक सुनीता नेर्लिकर, इतर बहुजन कल्याण विभागाच्या सुवर्णा सावंत, माध्यमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद विद्या किरवेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, जेष्ठ इतिहास तज्ञ जयसिंगराव पवार, इंद्रजीत सावंत, राहुल पाटील, आदिल फरास, वसंतराव मुळीक तसेच तृतीयपंथी समुदाय प्रतिनिधी मयुरीताई आळवेकर उपस्थितीत होत्या.
26 जून हा छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म दिवस दरवर्षी “सामाजिक न्याय दिन” म्हणून साजरा केला जातो. छत्रपती शाहू महाराज त्यांच्या कार्यकाळात ते सामाजिक न्याय प्रस्थापनेसाठी सदैव दक्ष होते. समाजातील दुर्लक्षित मागासवर्गीय दुर्बल घटकांच्या बाबतीत विशेष सहानुभूती व सुधारणावादी निर्णय महाराजांनी घेतले होते. मागासवर्गीय, दिव्यांग, वृद्ध, निराधार, दुर्बल इत्यादी घटकांच्या कल्याणावर त्यांनी अनेक निर्णय अंमलात आणले होते. याचा आदर्श विशेष करुन समाजापुढे यावा व कोल्हापुर ही राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जन्मभूमी व कर्मभूमी असल्याने दिनांक 26 जून हा दिवस छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म दिवस “सामाजिक न्याय - दिन” म्हणून मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला.
राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्यामधला सर्वात मोठा भाग हा त्यांच्या शैक्षणिक बदलांनी भरलेला आहे. सर्व जातींच्या मुला- मुलींना शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी कोल्हापुरात जातीनुरुप वसतीगृहे काढली. 1901 सालीच त्यांनी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना केली. त्यानंतर त्याच्या पुढच्यावर्षी त्यांनी मागास जाती-जमातीतल्या लोकांसाठी सरकारी नोकरीमध्ये निम्म्या जागा राखीव ठेवण्याचा आदेश काढला. शंभर वर्षांपुर्वी असा क्रांतिकारक निर्णय घेणं मोठं धा़डसाचं आणि आश्चर्याचं काम होतं, या व आशा अनेक क्रांतिकारी निर्णय व योगदान लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दिले होते. त्यांच्या या कार्याचा प्रचार - प्रसार व त्यांना अभिवादन करण्यासाठी जिल्हा प्रशासन व सामाजिक न्याय विभागाने राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म दिन सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यासाठी समता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
समता दिंडी व्हीनस कॉर्नर मार्गे माई साहेब पुतळा येथून बिंदू चौक येथे महात्मा जोतीबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून पुढे छत्रपती शिवाजी महाराज कोल्हापूर महानगरपालिका येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर गंगाराम कांबळे स्मारक या ठिकाणाहून अभिवादन करून सी.पी. आर पासुन पुढे दसरा चौक येथील मैदानात समता दिंडीची सांगता करण्यात आली.
समता दिंडीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, ( बार्टी पुणे ) यांनी समता दिंडीत भारतीय संविधानाची प्रस्ताविका असणारा चित्ररथासह सहभाग घेतला होता. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, सामाजिक न्याय विभाग अधिकारी, कर्मचारी तसेच अधिनस्त शासकीय वसतिगृहे, निवासी शाळा, इतर बहुजन कल्याण विभागाच्या आश्रम शाळा यांनी व जिल्ह्यातील सहभागी नागरिकानी पारंपरिक वेशभूषेत ढोल-ताशा, लेझीमपथक, शाहू महाराजांच्या जीवनपटावर चित्ररथ व हलगी वाद्य इत्यादी सह समता दिंडीत सहभागी होवून आकर्षक शोभा वाढविली. तसेच महामानवांची पुस्तके असणारी ग्रंथ पालखी समता दिंडीत लक्षवेधी ठरली.
छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय विभागांनी, तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, वंचित घटकातील नागरिक उदा. तृतीयपंथी नागरिक, जेष्ठ नागरिक, महिला, पोलिस अधिकारी, कर्मचारी विभाग, जिल्हा माहिती अधिकारी अधिकारी, कर्मचारी, राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालय, सी. पी. आर विभाग, वाहतूक अधिकारी, कर्मचारी विभाग , महानगरपालिका स्वछता विभाग, पत्रकार तसेच विविध महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी, एन.एस.एस, एन,सी.सी विद्यार्थी, विद्यार्थिनी, विविध तालमी, तरुणमंडळे, बचतगटे व जिल्ह्यातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून समता दिंडीस उदंड प्रतिसाद दिला याबद्दल सहायक आयुक्त श्री. साळे यांनी सर्वांचे आभार मानले.