सक्षम, आत्मनिर्भर, सुसंस्कारित विद्यार्थी घडविण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध : आमदार राजेश क्षीरसागर
schedule16 Jun 25 person by visibility 152 categoryशैक्षणिक

▪️जाधववाडीतील प्रिन्स शिवाजी शाळा आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून दत्तक
▪️शाळा प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी रंगला "शाळा प्रवेशोत्सव" उपक्रम
कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षणविषयक सर्व योजना विद्यार्थ्यांना आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहेत. या उपक्रमातून विद्यार्थ्यांची उपस्थिती व शालेय गुणवत्तेच्या वृद्धीसाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रस्तुत उपक्रमांमुळे आजचा विद्यार्थी भविष्यात राष्ट्राभिमानी, आत्मनिर्भर, यशस्वी व सुसंस्कारित नागरिक म्हणून घडेल, यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार मा. राजेश क्षीरसागर यांनी केले.
शालेय शिक्षण विभागाच्या वतीने "शाळा प्रवेशोत्सव" हा उपक्रम साजरा करण्यात आला. यानिमित जाधववाडीतील प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर या शाळेत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते गुलाबाचे फुल देवून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी, महानगरपालिका, जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये झळकत आहेत. या शाळांमध्ये वाढलेली शैक्षणिक गुणवत्तेमुळे पालकांचाही पाल्याला प्रवेश घेण्याचा ओघ या शाळामध्ये अधिक आहे. खासगी शिक्षण संस्थाप्रमाणे याही शाळामध्ये प्रवेशासाठी पहाटेपासून लागणाऱ्या रांगा हे चित्र सुखदायक आहे. या शाळामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थांना दर्जेदार शिक्षणासह मुलभूत सोयी सुविधा मिळणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे अशा शाळांना प्राधान्याने निधी देवून तेथील विकासकामे तडीस नेली जाणार असल्याचे सांगत जाधववाडीतील प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर दत्तक घेतल्याचे जाहीर केले. यासह याशाळेतील विकास कामांसाठी आमदार फंडातून तात्काळ रु.१० लाखांचा निधी जाहीर केला. या फंडातून मैदानाची सुरक्षा भिंत, दुसऱ्या मजल्याचा संरक्षक कठडा, नवीन दोन खोल्या, खो- खो व कबड्डी मैदान विकसित करणे आदी कामे करण्यात येणार असल्याचेही जाहीर केले.
ते पुढे म्हणाले कि, दर्जेदार शिक्षणासह राज्य सरकार उद्योग, आय.टी. क्षेत्राच्या विकासामध्ये मोलाची भर टाकत आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याचा दूरगामी विचार शासन करत आहे. लवकरच कोल्हापूर जिल्ह्यात उद्योग, आय.टी. क्षेत्रातील रोजगार उपलब्ध झाल्याचे पहायला मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. यासह प्रशासनाने विद्यार्थ्यांकडे कोणतेही दुर्लक्ष करू नये, शालेय पोषण आहाराचा दर्जा उत्तम असावा, शाळेत नियमित स्वच्छता, औषध फवारणी, आरोग्य शिबीर आयोजित करावी, असा सूचना प्राथमिक शिक्षण विभागास दिल्या.
यावेळी माजी नगरसेवक राजसिंह शेळके, अमर क्षीरसागर, मुख्य अग्निशमन अधिकारी मनिष रणभिसे, प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनअधिकारी रा.व्ही.कांबळे, शांताराम सुतार, शाळेच्या विश्वस्त सौ.कसबेकर, मुख्याध्यापक नितीन चौगुले, उपमुख्याध्यापिका सौ.खतीब, तहसीलदार गौसमोद्दिन, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास कांबळे, अश्विनी जंगम, ज्योती टोणपे, विद्या चीपरे, आशा चौगले, अमित गुरव, संस्कार शिबीर व्याख्याते सुजय देसाई, बामणे सर, विजय पाटील, मल्हारी पाटील आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता सरदेसाई आणि आभार गवळी यांनी मानले.