SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पहलगाम दहशतवादी हल्ला : राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीतघरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रासपर्यंत मोफत वाळू उपलब्ध करून देण्याच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देशऋतुराज पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित शुभेच्छाचा वर्षावशेतकऱ्यांनी शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीतील उत्पन्न वाढवावीवडनेरे समितीचा अहवाल मान्य असेल तर महापुरावर काय उपायोजना केल्या; खा. शाहू छत्रपती, आ. सतेज पाटील यांची विचारणा; जलसंपदामंत्र्यांना पाठवले पत्रबेकायदा होर्डिंग्ज,बोर्ड, बॅनर, फ्लेक्स चा सुळसुळाट; कोल्हापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष राज्य शासनाच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासाठी ७६ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूरप्रजेचे सुख व त्यांचे घर हीच खरी राज्याची तिजोरी : अहिल्याबाई होळकरकळंबे तर्फ ठाणे ग्रामपंचायतीच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरीस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर कोल्हापुरात इंडिया आघाडीची बैठक

जाहिरात

 

सडेतोड व रोखठोक, सत्यशोधक पत्रकार : वा.रा.कोठारी; ६ जानेवारी: पत्रकार दिनानिमित्त...

schedule06 Jan 25 person by visibility 309 categoryसामाजिक

✍️ डॉ.सुनीलकुमार सरनाईक, कोल्हापूर.

महात्मा जोतीराव फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळ थंडावली होती,  तिला पूनर्जिवित करण्यासाठी कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी प्रोत्साहन दिले, विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात सत्यशोधक चळवळीला पुन्हा नव्याने बाळसे धरले. बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड व करवीर नगरीचे संस्थानिक राजर्षी शाहू छत्रपती यांनी ब्राम्हणेत्तर समाजातील अज्ञान व अंधश्रद्धा दूर होण्यासाठी शिक्षण प्रसाराचे कार्य हाती घेतले, त्याकरिता शाळा काढल्या, वसतीगृहांची  स्थापना केली. संस्थानातील अधिकार पदांवर ब्राम्हणेतरांच्या नेमणूका करण्यात आल्या. संस्थानातील निरनिराळ्या खात्यांत ब्राह्मणेतर व्यक्तींना नोकऱ्या देऊन त्यांच्या आर्थिक व सामाजिक उत्कर्षाचा मार्ग मोकळा केला. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी ब्राह्मणविरोधी आक्रमक धोरण ठेवले. अर्थात वेदोक्त प्रकरणामुळे राजर्षी शाहू महाराजांनी सरळ सरळ ब्राह्मणांच्यातील ब्राह्मण्यांला थेट आव्हान दिले. तत्कालीन वृत्तपत्र सृष्टीत अभिजनांची मक्तेदारी होती, ही वृत्तपत्रे राजर्षी शाहू महाराजांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत होती. त्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते श्रीपतराव शिंदे यांनी १९१९ साली 'विजयीमराठा' हे वृत्तपत्र सुरू केले. तत्पूर्वी सत्यशोधक तसेच ब्राम्हणेतर चळवळीचा पुरस्कार करणारी वृत्तपत्रे अस्तित्वात होती.‌

अहमदनगर जिल्ह्यात मुकुंदराव पाटील यांचे 'दीनमित्र' हे वृत्तपत्र अगोदरपासूनच चालू होते. पण 'विजयीमराठा' सुरू होण्याच्या सुमारासच इतर ही काही नवी वृत्तपत्रे सुरु झाली, त्यात 'प्रभात'कार म्हणून नंतर ख्यातनाम झालेले वालचंद रा.कोठारी यांच्या 'जागरूक' या पत्राचा अग्रहक्काने उल्लेख केला पाहिजे. वा.रा.कोठारी हे महात्मा  फुले यांच्या सत्यशोधकी व समतावादी विचारांचे खंदे समर्थक होते.

"वरिष्ठ वर्गीयांकडून ज्याप्रमाणे सामाजिक समतेची मागणी ब्राह्मणेतर वर्ग करीत होता, तशी समता खालच्या पातळीवर अस्पृश्यांनाही लाभली पाहिजे,असा कोठारींचा आग्रह असे." (संदर्भ: मराठी वृत्तपत्रांचा इतिहास, लेखक:रा.के.लेले, पृष्ठ- ५६२)

 १९ जुलै १९१७ रोजी सत्यशोधक विचारांचा प्रसार करण्यासाठी कोठारी यांनी 'जागरूक' हे वृत्तपत्र पुणे येथून सुरू केले.  'जागरूक' चा पहिला अंक जरी १९ जुलै १९१७ रोजी प्रसिद्ध झाला असला तरी त्यांना हे वृत्तपत्र छापण्यात खूप अडचणी आल्या. सत्यशोधक विचारांचा प्रभाव असणाऱ्या कोठारी यांना मुळात पुण्यातील सनातनी विचारांच्या शक्तीने प्रचंड कोंडी करण्याचा प्रयत्न केला. 'जागरूक' छापण्यासाठी छापखाना मिळवतांना त्यांना खूप खटपट करावी लागली. पुण्यातील एक ही छापखानदार (प्रिंटींग प्रेसचे मालक) कोठारींचे पत्र छापून देण्यासाठी तयार होईनात. दैनिक 'ज्ञानप्रकाश' या प्रस्थापित वृत्तपत्राची म्हणजेच आर्यभूषण छापखान्याच्या मालक वर्गाची आणि कोठारी यांची चांगलीच उठबस होती, शिवाय कोठारी यांनी घेतलेल्या सत्यशोधक विचारांकडे सहानुभूती व आदराने पाहणारी ही मंडळी होती, तरी सुध्दा सत्यशोधकी विचारांचा प्रसार करणारे 'जागरूक' पत्र छापून देण्यासाठी त्यांनी असमर्थता दर्शवली. सरतेशेवटी लाॅ प्रिंटीग प्रेसचे मालक श्री. खांडेकर यांनी 'जागरूक' पत्र छापण्यासाठी तयारी दाखवली. 

 'जागरूक' मध्ये सत्यशोधक समाजाच्या तीन तत्वांचा प्रामुख्याने पुरस्कार करण्यात येत असे..
 १) देव आणि भक्त यांच्या दरम्यान मध्यस्थ नको. देवा पर्यंत स्वतंत्रपणे पोहोचण्यासाठी प्रत्येक भक्ताला, मग तो कोणत्याही जातीचा असो, त्याला तो हक्क आहे.
२) मनुष्याची योग्यता त्याच्या गुणावरून ठरवावी. जन्माशी त्या योग्यतेचा संबंध असता कामा नये. केवळ जन्मामुळे काहींना अस्पृश्य समजणे,ही प्रथा सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही.
३) सर्व प्रकारच्या विद्या संपादन करण्याचा सर्वांना हक्क आहे, आणि ती सर्वांनी संपादन केली पाहिजे, त्याशिवाय सामाजिक व आर्थिक विषमता नष्ट होणार नाही.
      ब्रिटीश सरकारने १९१७ साली, नव्या राजकीय सुधारणांची जेव्हा घोषणा केली, तेंव्हा मागासलेल्या वर्गातील लोकांनी व अस्पृश्यांनी त्यामध्ये वाटा मागावा व आपल्यासाठी राखीव कोठ्यातून प्रतिनिधित्व मिळवावे, असा 'जागरूक'कारांनी  प्रचार सुरू केला. पुढे स्वतंत्र प्रतिनिधित्वाची मागणी ब्रिटीश सरकारने अमान्य केल्यावर कोठारी यांनी 'जागरूक' मधून सरकारवर सातत्याने टीकेची झोड उठवली. परंतु त्याबरोबरच, आता सरकारवर अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर उभे राहण्याची आवश्यकता ब्राम्हणेतर समाजाच्या मनावर बिंबवण्याचा ही 'जागरूक'ने कसोशीने प्रयत्न केला असल्याचे दिसून येते. अर्थात सरकारच्या विरोधात न जाता सत्यशोधक समाजाच्या विकासासाठी कार्यरत रहाण्याची विचारसरणी असलेल्या आण्णासाहेब लठ्ठे, भास्करराव जाधव आदी ब्राम्हणेतर नेत्यांचा रोष 'जागरूक'कारांना पत्करावा लागला. ब्राम्हणेतर पक्षाच्या नेत्यांनी सतत सरकारचे लांगूलचालन चालू ठेवल्यामुळे ब्राम्हणेतर समाजाच्या प्रगतीसाठी अडसर होईल, असा ठाम विचार 'जागरूक' मधून १९२१ च्या अंकातून कोठारी सातत्याने करतांना दिसतात. 

 नेमस्तांशी सहकार्य करावे की नाही, नेमस्त पुढाऱ्यांना म्हणजे त्यांच्यातील ब्राह्मणांना सत्यशोधक चळवळीत भाग घेऊ द्यावा की नको, सरकारबरोबर कितपत संबंध ठेवणे सोयिस्कर आहे, इत्यादी प्रश्नांवरून कोठारी यांचे इतरांशी मतभेद झाले. 'विजयीमराठा'कार श्रीपतराव शिंदे यांच्याशी त्यांचा वाद सुरू झाला. एकाच ब्राम्हणेतर पक्षातील दोन वृत्तपत्रांचा हा वैचारिक संघर्ष योग्य नाही,या दोन्ही पत्रांचे आपसातील भांडण तात्काळ मिटावे,असे कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांना वाटत होते. 

"राजर्षी शाहू महाराजांचे म्हणणे असे होते की, तुमच्या पत्रांतून तुम्ही इंग्रज सरकारवर टीका करता हे बरे नाही. आपले ब्राम्हणेतर लोक मागासलेले आहेत. इंग्रज सरकारशी भांडण करणे त्यांना परवडणारे नाही. 'जागरूक' व 'विजयी मराठा' यांच्यामधील वाद शक्य तितक्या लवकर मिटावा.अशी शाहू महाराजांची उत्कट इच्छा होती. दोन्ही पत्रांच्या संपादकांनी शाहू महाराजांचा सल्ला मानून वाद बंद केला.(सं. मराठी वृत्तपत्राचा इतिहास, लेखक रा.के. लेले, पृ.५६३)

'जागरूक' पत्र सुरू केल्यानंतर दिनांक ३ ऑक्टोबर १९१८ रोजी श्री.कोठारी यांनी व्होरा यांच्या मदतीने 'डेक्कन रयत' या नावाने एक इंग्रजी साप्ताहिक सुरू केले. या इंग्रजी पत्रांतून सुध्दा त्यांनी बहुजन समाजहितासाठी सातत्याने लिखाण केले, इंग्रज सरकारने बहुजन समाजाला झुकते माप दिले पाहिजे, बहुजन समाजावर उच्चवर्णीय लोक जो अन्याय करतात, त्यावर कठोर नियंत्रण आणावे यासाठी ते पाठपुरावा करीत असत. 'डेक्कन रयत' या साप्ताहिक वृत्तपत्रासाठी कोठारी यांना बेळगाव येथे वकीली करीत असलेले रावबहादूर आण्णासाहेब बाबाजी लठ्ठे यांचे मोलाचे साहाय्य होते. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांचे ही सक्रिय सहकार्य लाभले होते, विशेष म्हणजे राजर्षी शाहू महाराज 'डेक्कन रयत' च्या अनेक प्रती खरेदी करून ते आपल्या विचारांच्या प्रस्थापनेसाठी विविध संस्था, व्यक्ती व नेत्यांच्याकडे पाठवित असत.

१९२२ ला राजर्षी शाहू महाराज निर्वतल्यानंतर 'जागरूक' पत्र बंद पडले. पण पुढे दोन तीन वर्षांनंतर कोठारी यांनी १९२५ साली पुन्हा 'जागरूक' पत्र सुरू केले, पण ते ही जास्त काळ न चालता बंद पडले. पुढे त्यांनी लोकशाही स्वराज्य पक्षासाठी 'राष्ट्रमत' हे वृत्तपत्र चालविले. पण पुढे 'राष्ट्रमत' बंद पडल्यानंतर त्यांनी १९३८ साली पुण्यातून 'दैनिक प्रभात' ची तुतारी फुंकली. कोठारी यांच्या मृत्यूनंतर आजही पुणे येथे दैनिक प्रभात ची ललकारी दमदारपणे सुरू आहे.   
    
 वा.रा.कोठारी यांची १९३८ ते १९७४ अशी सुमारे ३६ वर्षें प्रदीर्घ वृत्तपत्रीय कारकीर्द राहिली आहे. अर्थात १९३८ पूर्वी त्यांनी काही ठिकाणी लेखन केले आहे. पुढे  मालक संपादक म्हणून त्यांनी आपली धारदार लेखणी सतत ३६ वर्षे तळपत ठेवली. ह्या त्यांच्या तळपत्या लेखणीने विश्रांती घेतली ती  ११ फेब्रुवारी १९७४ रोजी अकस्मात झालेल्या त्यांच्या मृत्यूनेच. त्यांच्या वृत्तपत्रीय लिखाणातील सातत्य वाखाणण्याजोगे होते. "दैनिक प्रभात" मधील सातत्याने केलेल्या त्यांच्या लिखाणातील झपाटा आणि विषयांचे वैविध्य आज ही वृत्तपत्रविद्या विभागाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक व प्रेरणादायी असल्याचा प्रत्यय येतो.

  वा. रा.कोठारी यांनी "दैनिक प्रभात" च्या अग्रलेखाच्या माध्यमातून अनेक तत्कालीन ऐरणीवर असलेल्या प्रश्नांविषयी
सडेतोड उहापोह केला असल्याचे दिसून येते. अग्रलेखावर लेखक - संपादकांचे नाव घालण्याची प्रथा कधीच नव्हती. अशा काळात वा.रा.कोठारी यांचे अनेक अग्रलेख त्यांच्या नावाने प्रसिद्ध झालेले दिसतात. अग्रलेखावर संपादकांनी नाव न लिहिण्याचा वृत्तपत्रीय संकेत मोडून त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचेही स्पष्टपणे दिसून येते. अर्थात याविषयीचे त्यांचे समर्थन ही योग्य आणि महत्वाचे वाटते. "कोणत्याही विषयावर विचार मांडण्याचे किंवा मतप्रदर्शन करण्यासाठी योग्य ठिकाण म्हणजे अग्रलेखाचा स्तंभ होय." असे ते याविषयी स्पष्टपणे नमूद करतात.

राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पातळीवरील घटनांपासून ते स्थानिक पातळीवरील प्रश्नांपर्यंत विविध विषयांवर त्यांनी दैनिक प्रभात च्या अग्रलेखातून स्वतःचे मत अत्यंत परखडपणे मांडले असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या राष्ट्रीय राजकारणापासून ते बालगंधर्व यांच्या संगीत नाटकांपर्यंत त्यांना कोणताही विषय आपल्या अग्रलेखासाठी वर्ज्य मानलेला नव्हता. मात्र एकुणच त्यांच्या लेखणीतून त्यांचा प्रामाणिकपणा आणि निस्पृह वृत्तीचा पुरेपूर दिसतो

दैनिक वृत्तपत्रांच्या संपादकाला दररोजच्या ताज्या घडामोडीवर अग्रलेख लिहून भाष्य करावे लागते, मग तो विषय त्यांच्या आवडीचा असो अगर नसो,परंतू वा.रा.कोठारी याला अपवाद ठरले आहेत; कारण राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व तऱ्हेच्या विषयांमध्ये त्यांना अगदी मनापासून रस होता. त्यांनी "लिहावे लागते" म्हणून ओढून ताणून कधीच लिहिले नाही, तर " लिहावेसे वाटते" म्हणून त्यांनी अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण लिखाण केल्याचे दिसून येते.

१९३८ ते १९७४ या ३६ वर्षात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक क्षेत्रांत वेगाने स्थित्यंतरे झाली, विविध घटना घडल्या.यांवर वा.रा.कोठारी यांनी दैनिक प्रभात च्या अग्रलेखातून अभ्यासपूर्ण विवेचन केले असल्याचे दिसून येते. दुसरे जागतिक महायुद्ध, १९४२ चार महात्मा गांधी यांचा ' चलेजाव ' चार लढा, १९४५ सालची युद्ध समाप्ती, १९४७ साली देशाला मिळालेले स्वातंत्र्य, पंडित जवाहरलाल नेहरू यांची पंतप्रधानपदी विराजमान झालेली कारकीर्द, १९४८ मध्ये झालेली महात्मा गांधी यांची झालेली दुर्दैवी हत्या,१९५२ सालच्या देशातील सार्वत्रिक निवडणूका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला बौद्ध धर्मातील प्रवेश, संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, गोवा मुक्तीचा लढा,भारत - चीन युद्ध, भारत - पाकिस्तान युद्ध , दुष्काळ आणि भुकंप यासारख्या नैसर्गिक आपत्ती, काॅंग्रेसचे बदलत गेलेले राजकारण, राज्याराज्यांतील पंचवार्षिक निवडणूका, भारत - पाकिस्तान, भारत - चीन, भारत - रशिया, भारत - श्रीलंका संबंध यांसारख्या विविध घटना व घडामोडींवर वा.रा. कोठारी यांनी त्या त्या वेळी आपल्या अग्रलेखातून भाष्य केले आहे.

   देशातील राजकारणात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर इंदिरा गांधी यांचा फार मोठा प्रभाव राहिला होता. त्यांचे झुंजार नेतृत्व, लोभस व करारी व्यक्तिमत्त्व, आणि त्यांची बेधडक राजकीय धोरणे या संदर्भात जवळपास सर्वच समकालीन वृत्तपत्रातून वेळोवेळी लिखाण प्रसिद्ध झाले असल्याचे दिसून येते, मात्र वा.रा.कोठारी यांनी श्रीमती इंदिरा गांधी यांच्या वर सडकून टीका केली असल्याचे दिसून येते. श्रीमती इंदिरा गांधी यांचे टीकाकार अशीच भूमिका त्यांनी घेतली असल्याचे दिसून येते.

वा.रा.कोठारी यांच्या अग्रलेखाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे सर्व लिखाण अतिशय सोपे, सुटसुटीत आणि आपला वाचकवर्ग लक्षात घेऊन केलेले असायचे.मराठी, संस्कृत, व इंग्रजी या भाषांचा त्यांचा गाढा व्यासंग होता. त्यांच्या अग्रलेखातील लिखाण भाषेच्या बाबतीत कोठेही क्लिष्ट किंवा जड झाले असल्याचे दिसून येत नाही. त्यांना आपल्या संपादकाच्या भुमिकेचे नेमके भान होते, तसे आपल्या वाचकवर्गाची नेमकी सामाजिक व आर्थिक कुवत काय होती याचीही जाण होती, सर्वसामान्य वाचकांना समजेल, असे लेखन असावे यावर त्यांचा कटाक्ष असायचा. वृत्तपत्राचा संपादक विद्वान असावा, अभ्यासू असावा परंतु त्याचे लिखाण सामान्य वाचकांशी थेट संवाद साधणारे असावे, साधे, सरळ, सोपे असावे असे त्यांचे स्पष्ट मत होते. या पार्श्वभूमीवर दैनिक प्रभात च्या अग्रलेखाची रचना व शैली दिसून येते. अग्रलेख लिहिणाऱ्या संपादकाला केवळ पत्रकारितेचे ज्ञान किंवा कौशल्य असून चालत नाही तर त्याच्या जवळ काही निश्चित अशी वैचारिक धारणा व मूल्यांशी बांधिलकी असणे आवश्यक असते. वा.रा. कोठारी. यांच्याकडे ही वैचारिक धारणा व मूल्यांची बांधिलकी निश्चितपणे होती. त्यामुळेच त्यांच्या अग्रलेखातील तोल ढळलेला दिसून येत नाही. राजकीय व सामाजिक प्रश्नांवरची त्यांची भूमिका ठाम आणि निश्चित होती. त्यामुळे त्यांच्या अग्रलेखांना ठाम आणि निश्चित दिशा प्राप्त झाली असल्याचे दिसून येते. प्रत्येक अग्रलेखातून त्यांनी उच्च मूल्यांची जोपासना केली असल्याचे ही दिसून येते.

महात्मा जोतीराव फुले यांच्या सत्यशोधक चळवळीशी व त्यांच्या विचारांशी वा.रा. कोठारी यांचे नाते होते, त्यामुळे बुध्दीला पटल्याशिवाय कोणताही विचार स्विकारण्याची त्यांच्या मनाची तयारी नव्हती. महात्मा फुले यांनी सांगितलेला बुद्धीप्रामाण्यवाद आणि त्यासाठी लागणारी सत्यशोधकवृत्ती त्यांच्या अंगात भिनलेली होती. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत सातत्याने त्यांनी पाठिंबा दिला असल्याचे दिसून येते, असा पाठिंबा देताना त्यांची हीच वैचारिक बैठक दिसून येते.

 वा.रा. कोठारी यांच्या अग्रलेखाचा अभ्यास करताना असे लक्षात येते की, त्यांच्या अग्रलेखातून माहिती देण्यावर भर असला तरी त्या घटनेचे विश्लेषण करण्यास किंवा त्या घटनेबद्दल सडेतोड आणि परखड भाष्य करण्यात ते कुठेच कमी पडत नाहीत.

 आपले 'प्रभात ' हे दैनिक केवळ वृत्तपत्र नसून ते मतपत्र आहे अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे आपल्या अग्रलेखातून लोकमत घडविण्याची एकही संधी ते सोडत नव्हते.संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो, किंवा श्रीमती इंदिरा गांधी यांचे राजकारण असो, अग्रलेखातून जनमाणसांवर आपल्याला प्रभाव पाडता येतो, याविषयी त्यांना ठाम विश्वास होता. मुद्रित माध्यमाची ताकद त्यांनी ओळखली होती. त्यामुळे प्रतिपक्षावर टीका करताना त्यांची लेखणी कधीच कचरली नाही. त्यांचें लेखन सडेतोड व रोखठोक तसेच मुद्देसूद असायचे.  त्यामध्ये घटनेचे बारीकसारीक तपशील असायचे.अनेक प्रश्नांबाबत मूलगामी विवेचन करण्याची त्यांची वृत्ती त्यांच्या अग्रलेखातून प्रकर्षाने दिसून येते.

*संदर्भ:*
१) मराठी वृत्तपत्रांचा इतिहास: लेले रा.के.(काॅन्टिनेंटल, द्वितीयावृत्ती,२००४)
२)'प्रभात'कार वा.रा.कोठारी: विचार आणि कार्य: संपादक मृणालिनी शहा, डॉ जयंत वष्ट, श.वि. राशिनकर (१९९३)
३) मराठी वृत्तपत्रसृष्टीचे अंतरंग:‌ प्रसन्नकुमार अकलूजकर (श्रीविद्या प्रकाशन,२०००)

✍️ डॉ.सुनीलकुमार सरनाईक,
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes