रायगड जिल्ह्यातील वादळी वाऱ्यांचा फटका बसलेल्या नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत द्यावी
schedule09 May 26 person by visibility 105 categoryराज्य
◼️महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश; नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
मुंबई : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे अनेक ठिकाणी झालेल्या वादळी वाऱ्यांमुळे शेती पिकांचे, घरांचे तसेच अन्य मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागांमध्ये तात्काळ पंचनामे करून बाधित नागरिकांना मदत पोहोचविण्याचे निर्देश महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे तसेच सर्व संबंधित प्रांताधिकाऱ्यांना दिले आहेत.
प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून नागरिकांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कोणताही धोका किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे.
या संकटाच्या काळात शासन नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे असून सर्व यंत्रणा नागरिकांच्या सुरक्षेसाठी सज्ज असल्याचे प्रशासनाने कळविले आहे